सांगली: सांगली जिल्ह्यातील पूरप्रवण गावांना आपत्कालीन मदतीसाठी बोटी देण्याचा निर्णय मंत्र्यांच्या उद्घाटन समारंभामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनी संबंधित गावांना दिलेल्या बोटी केवळ उद्घाटन समारंभासाठी परत मागवल्या होत्या. अखेर रविवारी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी समारंभपूर्वक बोटींचे वितरण करून आपलेच म्हणणे खरे केले. मुळातच वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर दिलेल्या बोटी केवळ फोटो सेशनसाठी माघारी घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल पूरप्रवण गावांनी उपस्थित केला आहे.

गेल्यावर्षी सांगली जिल्ह्यातील १०४ गावांना महापुराचा फटका बसला. यातील अनेक गावांना पुराच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी जीव धोक्यात घालाव लागला. ब्रह्मनाळमध्ये जुनी लाकडी बोटी उलटून १७ जणांना जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूरप्रवण गावांना यांत्रिक बोटी देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात २० जुलैला १५ गावांना बोटी सुपूर्द करण्याचे निश्चित झाले. प्रत्यक्षात मात्र ऑगस्ट महिना उजाडला तरी गावांना बोटी मिळाल्या नाहीत. अखेर जोरदार पावसामुळे पुन्हा महापुराचा धोका समोर दिसू लागताच गावांनी बोटी मिळाव्यात असा आग्रह धरला. जिल्हा परिषदेने गावांना निरोप देऊन बोटी घेऊन जाण्यास सांगितले. सात ऑगस्टला बहुतांश गावांनी बोटी ताब्यात घेतल्या. मात्र, बोटींच्या वितरणाचा समारंभ नाही, उद्घाटन नाही, फोटो सेशन झाले नसल्याने राज्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली.

वाचाः

गावात पोहोचलेल्या बोटी प्रशासनाने परत बोलवल्या. ब्रह्मनाळ ग्रामपंचायतीने मात्र प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध करून बोट परत पाठवली नाही. प्रशासन आणि जिल्ह्यातील मंत्र्यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, पूरबाधित गावांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून अखेर जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी रविवारी बोटींच्या वितरणाचा लोकार्पण सोहळा घेतलाच.

ब्रह्मनाळ वगळता अन्य गावांना बोटींची वितरण केले. यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ब्रह्मनाळकरांनी आततायीपण केल्याचा आरोपही केला. दरम्यान, २० जुलैलाच बोटी देणार होता, तर मग एवढा विलंब का लावला, असा सवाल पूरबाधित गावांनी उपस्थित केला आहे. तातडीच्या कामातही मंत्र्यांनी फोटो सेशनची संधी सोडली नाही, अशा भावना पूरबाधितांनी व्यक्त केल्या.

वाचाः

ब्रह्मनाळमध्ये दुर्घटनेच्या ठिकाणी वृक्षारोपण
ब्रह्मनाळमध्ये पुराच्या पाण्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्तीनिमित्त ब्रह्मनाळकरांनी दुर्घटनेच्या ठिकाणी वृक्षारोपण केले. मंत्री पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना ब्रह्मनाळच्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अधिका-यांनी तपासणी करूनच बोटी दिल्या होत्या. बोटी निकृष्ट किंवा सदोष असत्या तर खरेदीचा व्यवहार झालाच नसता. केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मंत्र्यांनी काहीही कारण सांगणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया ब्रह्मनाळकरांनी व्यक्त केल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here