कोल्हापूर : बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदीचा आदेश देण्यात आला असून रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसांकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे आजपासून रत्नागिरी जिल्हाबंदीसह बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट , चित्र अथवा व्हिडिओ प्रदर्शित करण्याबाबतही शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. काल रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या वतीने रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांना समक्ष ही नोटीस बजावण्यात आली आहे.बारसू प्रकल्पास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही शासनाकडून त्याठिकाणी जमीन संपादित करण्याबाबत व सदर प्रकल्पाच्या जमीन गुणवत्तेबाबतच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उडी घेतली असून त्यांच्या प्रतिनिधींनी प्रकल्पस्थळी उपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे. तर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मारहाण झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत ‘चलो रत्नागिरी’चा नाराही दिला होता.

पोलिसांना पाठवा, लाठीमार करा असं लिहिलं होतं का?, बारसू रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरे आक्रमक

मराठी भाषेवर महाराष्ट्रदिनीच अत्याचार? सरकारी जाहिरातीतील भाषावापरावर मराठीप्रेमींची टीका

दरम्यान, आता राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचे कारण दाखवित रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३१ मे पर्यंत राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली असून यामध्ये सोशल मीडियावरही पोस्ट, चित्र अथवा व्हिडिओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे. अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्याठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कांवर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायरप्रमाणे वागू लागलं आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम सरकार करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here