म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : शेतातील वीजजोडणीसाठी वायर पुरवण्याकरिता २०० रुपयांची लाच मागितल्याच्या गुन्ह्याबद्दल झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेतून एमएसईबीच्या (आता महावितरण) ज्युनिअर इंजिनीअरची तब्बल २५ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाली. मात्र, या प्रदीर्घ कालावधीत त्या इंजिनीअरचे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. सन २००२मधील शिक्षा सुनावणीमुळे त्याने केवळ नोकरीच गमावली नाही, तर आपला भरला संसारही गमावला.प्रवीण वसंतराव शेळके, असे या इंजिनीअरचे नाव आहे. विशेष एसीबी न्यायालयाने २४ ऑक्टोबर २००२ रोजी त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवून दोन वर्षांच्या सक्तमुजरीची शिक्षा ठोठावली. त्याविरोधात शेळके यांनी त्याच वर्षी अपील केल्यानंतर ते जामिनावर होते. न्या. भारती डांगरे यांच्यासमोर मागील महिन्यात झालेल्या अपिलावरील सुनावणीत अॅड. अनिकेत निकम यांनी शेळके यांची बाजू प्रभावीपणे मांडली. ‘विहिरीतून पाणीपुरवठा होण्यासाठी घेतलेल्या वीजजोडणीकरिता आवश्यक वायर मागितली असता, शेळके यांनी २०० रुपयांची लाच मागितली’, अशी तक्रार नवनाथ जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली होती. त्यानंतर सापळा लावून शेळके यांना अटक करण्यात आली. तर ‘गावातील ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानंतर ते बिघडले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी अर्ज आल्यानंतर विजेची थकबाकी भरण्यास मी सांगितले होते. त्यामुळे मला लक्ष्य करून खोट्या प्रकरणात अडकवले’, असा शेळके यांचा दावा होता. याबाबत सर्व साक्षीपुराव्यांचा विचार केल्यानंतर ‘सरकारी पक्षाने दाखल केलेल्या खटल्यात संशयाला जागा असून कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्रुटींकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे अपिलार्थीला (शेळके) संशयाचा निश्चित फायदा द्यावा लागेल’, असे निरीक्षण न्या. डांगरे यांनी नोंदवले. तसेच शेळके यांच्याविरोधातील शिक्षा रद्दबातल करत त्यांना निर्दोष ठरवले.
IAS Transfers : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नितीन करीर वित्त, तुकाराम मुंढे पशुसंवर्धन विभागात
‘एमएसईबीच्या निर्णयाचीच खरी खंत’

‘मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्यानंतर कनिष्ठ न्यायालयानेही चुकीचा निर्णय दिला. मात्र, त्यामुळे माझी एमएसईबीमधील नोकरी गेली. पत्नीसोबतचे वाद विकोपाला गेले. त्यामुळे दहा वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगा यांना सोबत घेऊन ती मला सोडून गेली. घरी आई-वडील आजारी असायचे. अशातच हे संकट ओढवल्याने त्या काळात माझे खूप हाल झाले. भावंडांनी थोडा आधार दिल्याने तग धरू शकलो. उच्च न्यायालयातील अपिलावर आज ना उद्या सुनावणी होईल आणि आपल्याला न्याय मिळून एमएसईबीमधील नोकरीही पुन्हा मिळेल, अशी आशा होती. दोन वर्षांपूर्वी करोनाचे संकट आल्यानंतर तर मी खूपच व्याकूळ होऊ लागलो. पूर्वीच आत्महत्या केली असती, तर बरे झाले असते, असे विचारही मनात येऊ लागले. अखेर विपश्यनेच्या माध्यमातून मन शांत केले. आज अखेर न्याय मिळाला असला, तरी मनावरील जखमा कधीच भरून निघू शकत नाही. मी खूप प्रामाणिक काम करत होतो आणि वरिष्ठांना त्याची माहितीही होती. त्यामुळे माझ्याविरोधात खटला चालण्याची परवानगी देण्याआधी एमएसईबीने माझ्या आधीच्या कारकिर्दीचा विचारच केला नाही; प्रामाणिकपणाला किंमत नाही, याचीच आयुष्यात खरी खंत आहे’, अशा भावना प्रवीण शेळके यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केल्या.
उत्पन्नवाढीसाठी ‘बेस्ट’ पाऊल, २६ आगारांचा व्यावसायिक वापर होणार, सल्लागारही नेमणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here