मुंबई : देशातील लाखो प्रवाशांच्या खिशाला परवाडी सेवा देणारी गोफर्स्ट एअरलाइन दिवाळखोरीच्या मार्गावर पोहोचली आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या वाडिया समूहाच्या मालकीच्या गो फर्स्ट एअरलाइनने ३, ४ आणि ५ मे रोजीची सर्व उड्डाणे रद्द केली असून कंपनीने NCLT मध्ये ऐच्छिक दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. त्यांच्याकडे ना तेल आहे ना पैसा आहे, असे कंपनीने म्हटले आहे. अशा स्थितीत ३, ४ आणि ५ मे रोजी गो फर्स्ट एअरलाइनचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागेल.

गो फर्स्टचा प्रवाशांना झटका
पुढील तीन दिवसांसाठी उड्डाणे रद्द केल्यामुळे एअरलाइनचे सुमारे ५५,००० ते ६०,००० प्रवासी प्रभावित होण्याची शक्यता आहे. सध्या, गो फर्स्ट सुमारे २० दैनंदिन देशांतर्गत उड्डाणे चालवत असून या उन्हाळी हंगामात २२० फ्लाइट्सना मान्यता मिळाली आहे. तर मार्च महिन्यात ८.९५ लाख प्रवाशांनी प्रवास केला.

Go First एअर झाली दिवाळखोर! वाडिया कुटुंबाच्या विमान कंपन्यांचे पुढे काय होणार, जाणून घ्या तपशील
गो फर्स्ट एअरलाइनचे तिकीट बुक केलेल्या प्रवाशांनी काय करावे?
जर तुम्ही ३ ते ५ मे या काळात गो फर्स्ट एअरलाइनचे तिकीट बुक केले असल्यास तुम्ही सर्वप्रथम एअरलाइनच्या संपर्कात असल्याची खात्री करा. तसेच एअरलाइन देखील तुमच्याशी संपर्क साधू शकते. डीजीसीएच्या नियमांनुसार, जर एखाद्या विमान कंपनीने उड्डाण रद्द केले असेल तर प्रवाशांना रिफंड (परतावा) दिला जातो.

गो फर्स्टने ३ मे साठी नवी मुंबई ते नवी दिल्ली हे सर्वात स्वस्त भाडे १०,००० रुपये पेक्षा जास्त देऊ केले होते. तर दिल्ली ते मुंबई सर्वात स्वस्त विमान ५,००० रुपयांपेक्षा जास्त विकले जात आहे. शिवाय, ३ मे साठी मुंबई ते लखनऊ सर्वात स्वस्त भाडे रु. १८,००० आहे.

परतावा कसा मिळणार?
एअरलाइनने म्हटले की ज्या प्रवाशांनी ३ ते ५ मे दरम्यान प्रवासासाठी बुकिंग केले ते पूर्ण परतावा मिळण्यास पात्र आहेत. वेबसाइटवरून बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना वेबसाइटवरच रिफंड मिळू शकतो. तर ज्या ग्राहकांनी ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटरद्वारे बुकिंग केलेय, त्यांना देखील स्त्रोत खात्यात परतावा मिळेल. मात्र, जर परतावा जारी केला गेला नाही तर, ग्राहक ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटरशी देखील संपर्क साधू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here