Mumbai Crime News: तुमच्या कुरिअरमध्ये, पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचा कॉल करून हजारो जणांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला हैदराबादमधून बेड्या ठोकल्या.

 

crime news
मुंबई: दिवसाला ५ ते १० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्याला ठगाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीनिवास राव डाडी (४९) असं आरोपीचं नाव आहे. बारावी पास असलेल्या श्रीनिवासची टीम अनेक शहरांमध्ये विखुरली होती. ही टीम महिलांना लक्ष्य करायची. चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन ही टोळी महिलांकडून लाखो रुपये उकळायची. या माध्यमातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालायची.पोलीस उपायुक्त (झोन ११) अजय कुमार बन्सल यांनी श्रीनिवासच्या टोळीची मोडस ऑपरेंडी सांगितली. ‘श्रीनिवासला मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बांगूर नगर पोलिसांच्या पथकानं हैदराबादच्या आलिशान हॉटेलमधून अटक केली. श्रीनिवास बारावी शिकला आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत तो अतिशय कुशल आहे. याच तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यानं कोट्यवधींची कमाई केली. श्रीनिवाससोबत त्याच्या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना ठाण्यातून, तर दोघांना कोलकात्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती बन्सल यांनी दिली.
हॅलो, ५० चहा पाठवा! दररोज पहाटे ४ वाजता कॉल; बीच रिसॉर्टवर पोलिसांची धाड, आत काय चालायचं?
‘तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलंय’
श्रीनिवासची टोळी महिलांना गळाला लावायची. तुम्ही मागवलेल्या पार्सलमध्ये (कुरियर) अमली पदार्थ किंवा हत्यार असल्याचा कॉल महिलांना केला जायचा. त्यांच्याकडे बँक खात्यांची माहिती मागायचा. बँक तपशील द्या, त्या माध्यमातून आम्ही कुरिअरची पडताळणी करतो, असं सांगितलं जायचं. या कॉलमुळे बहुतांश महिला घाबरायच्या. त्या आपल्या बँक खात्याचा तपशील किंवा प्राप्तिकराशी संबंधित माहिती टोळीतील सदस्यांना द्यायच्या. यानंतर पीडितांकडे वन टाईम पासवर्ड (ओटीपी) मागितला जायचा. ही संपूर्ण माहिती गोळा केल्यावर आरोपी पीडितांच्या खात्यातून पैसे लंपास करायचे.
कर्जत लोकलमध्ये प्रवाशाचा मृत्यू, ओळख पटेना; पोलिसांचं लक्ष शर्टच्या लेबलवर गेलं अन् मग…
बऱ्याच प्रकरणांमध्ये श्रीनिवासची टोळी पीडितांना मोबाईलमध्ये ऍनीडेस्कसारखे ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगायची. त्यानंतर मोबाईल हॅक करून फसवणूक केली जायची. अशा प्रकारे श्रीनिवासच्या टोळीनं देशभरात हजारो लोकांना फसवलं. फसवणूक करून केलेली सारी रक्कम श्रीनिवासच्या खात्यात जमा व्हायची. त्याच्या बँक खात्यात दररोज ५ ते १० कोटी रुपयांचे व्यवहार व्हायचे. हा पैसा श्रीनिवास चिनी नागरिकाला पाठवायचा. त्यानंतर रकमेचं रुपांतर क्रिप्टोकरन्सीमध्ये केलं जायचं.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

काळेधंदे लपवण्यासाठी श्रीनिवास रिअल इस्टेट व्यवसाय चालवण्याचं नाटक करायचा. टेलिग्राम ऍपच्या माध्यमातून संवाद साधायचा. पोलिसांनी त्याची ४० बँक खाती सील केली आहेत. त्याच्याकडे १.५ कोटींची रोकड सापडली. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, झारखंड, हरयाणात छापे टाकले जात आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here