म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : पाइपलाइन फुटणे, गळती होणे आदी कारणांमुळे सात धरणांतून मुंबईला होणारा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. अनेक कारणांमुळे पाण्याची नासाडीही होते. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तानसा धरणाच्या ब्रिटिशकालीन मुख्य जलवाहिन्या बदलण्याचे काम मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने हाती घेतले आहे. तानसाच्या मरोशी येथे दोन हजार ४०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी बसवण्यात येत असून जुलै २०२३पर्यंत ती कार्यान्वित होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर मरोशी ते सहारदरम्यान दोन हजार मिलिमीटर व्यासाच्या नवीन मुख्य जलवाहिनीचे काम येत्या दोन ते तीन महिन्यांत हाती घेण्यात येणार आहे.मुंबईला सध्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा आणि भातसा या जलस्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० किलोमीटर व त्यापेक्षाही जास्त अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी तलाव असून या सर्व जलाशयांतून दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. सध्या ३० टक्के पाणीगळती होते. ती गळती थांबविणे आणि पुरवठा सुरळीत ठेवणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे आणि त्यांचे आयुर्मान शंभर वर्षे राहील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एकंदरीतच मुंबईकरांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, पाण्याची कमतरता भासणार नाही आणि त्यात आणखी सुधारणा करता यावी, यासाठी मुंबई पालिकेकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. त्यात नवीन जलवाहिन्या टाकणे आणि त्यांचे जाळे विस्तारण्याचे कामही पालिकेने हाती घेतले आहे.

यामध्ये तानसा धरणाच्या जलवाहिन्यांच्या कामांचा समावेश आहे. तानसा पूर्व आणि पश्चिम येथील भांडुप अँकर ब्लॉक ते मरोशी गेट टप्पा दोनदरम्यान अस्तित्वात असलेली एक हजार ८०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्याऐवजी दोन हजार ४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत असून ते काम प्रगतिपथावर आहे. ७० टक्के काम पूर्ण झाले असून जून २०२३पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे काम काही तांत्रिक कारणांमुळे जूनऐवजी येत्या जुलैपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. काम पूर्ण झाल्यानंतर तानसातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा आणखी सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
विद्याविहार पुलाच्या कामाला गती, गर्डर बसवण्यासाठी मेगाब्लॉकचा प्रस्ताव; घाटकोपरमधील वाहतूक कोंडी सुटणार
२००० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचेही काम सुरू होणार

मरोशी ते सहार गावादरम्यान जुन्या एक हजार ४५० मिलिमीटर व्यासाच्या जुळ्या तानसा जलवाहिन्या बदलून दोन हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम २०२२-२३मध्ये प्रस्तावित केले होते. आता त्यालाही गती दिली जात आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून दोन ते तीन महिन्यांत कामाला सुरुवात होईल, असेही सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here