जिवती तालुक्यातील केकेझरी येथील सचिन राजाराम गायकांबळे आपल्या दोन मुलांना घेऊन दुचाकीने जिवती येथे सोमवारला गेले होते. मुलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर सायंकाळी सहा वाजताचा सुमारास जिवती येथून मुलांना घेऊन दुचाकीने गावाकडे निघाले होते.परमडोली- जिवती मार्गांवरून जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पुलाखाली कोसळली.
सचिन राजाराम गायकांबळे, अनुष सचिन गायकांबळे या बाप लेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर, दुसरा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्या मार्गावरुन ये जा करणाऱ्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमी मुलाला उपचारासाठी तात्काळ जिवती येथे दाखल केले आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला पाठवण्यात आले आहे. बाप लेकाच्या मृत्यूमुळं गावात शोककळा पसरली आहे.
तर जीव वाचला असता….
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुका अनेक समस्यांनी ग्रासला आहे. तालुक्यातील अनेक गावात जाण्यासाठी आजही मार्ग नाहीत. जे मार्ग आहेत त्यांची अवस्था बिकट आहे. काही ठिकाणी एकेरी रस्ता आहे. त्यात अनेक पुलांना कठडेच नाहीत. ज्या पुलावरून दुचाकी खाली कोसळली, त्या पुलाला कठडे असते तर बापलेकांचा जीव वाचला असता असे आता बोलले जात आहे.
दरम्यान, गेल्या महिनाभरात राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं नागरिकांनी दुचाकीचा वापर करताना हेल्मेटचा वापर करणं आवश्यक झालं असून वाहतूक नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे.