नवी दिल्ली : महाराष्ट्रात मागील वर्षी घडलेल्या ऐतिहासिक राजकीय घडामोडींनंतर सुप्रीम कोर्टात पोहोचलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांबाबत काही महिने झालेल्या सुनावणीनंतर अखेर आज घटनापीठाने आपला निकाल जाहीर केला. या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीही तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मात्र मोठी अडचण झाली. कारण कोर्टाने आपल्या निकालात कोश्यारी यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी कोश्यारी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांनी मोजक्या शब्दांत कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.’मी राज्यपाल पद सोडून काही महिने उलटले आहेत. राजकीय घटनांपासून स्वत:ला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न मी करत असतो. सुप्रीम कोर्टात जे प्रकरण होतं, त्याबाबत कोर्टाने आता निर्णय दिला आहे. मात्र त्या निर्णयावर भाष्य करायला मी काही कायद्याचा विद्यार्थी नाही. मी केवळ संसदीय परंपरा जाणतो आणि त्यावेळी मला जे योग्य वाटलं त्याबाबत मी विचारपूर्वक पावलं उचलली होती,’ असं म्हणत भगतसिंह कोश्यारी यांनी कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच माझ्याकडे त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आला होता. मग तुम्ही राजीनामा देऊ नका, असं मी म्हणणं अपेक्षित होतं का? सुप्रीम कोर्टाने काही म्हटलं असेल तर त्याचं विश्लेषण करण्याचं तज्ज्ञांचं काम आहे, ते काम माझं नाही, असंही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले पण शिंदे-फडणवीसांनी एकच मुद्दा लावून धरला, ठाकरेंची उडवली खिल्ली

कोश्यारींना फटकारताना कोर्टाने काय म्हटलंय?

सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केलं होतं. तसंच ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडतानाही कोश्यारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही आपल्या निकालात राज्यपालांवर ताशेरे ओढले आहेत. ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विश्वास गमावला आहे की नाही, हे राज्यपाल यांनी आधी तपासायला हवं होतं. कोणत्याही पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असली तरी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणं, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही. राज्यपाल कोश्यारी यांनी या प्रकरणात आपल्या विशेषाधिकाराचा जो वापर केला तो कायद्याप्रमाणे नव्हता. त्यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगणे चुकीचं होतं,’ अशा शब्दांत घटनापीठाने आपल्या निकालात कोश्यारी यांनी सत्तासंघर्षाच्या काळात घेतलेल्या भूमिकेवरून फटकारलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here