नागपूर : सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैर झडत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकास्त्र सोडलं. या टीकेला आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘शरद पवार यांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरवली, तर कठीणच होईल आणि मग वसंतदादांच्या सरकारच्या काळातील इतिहासापासून सुरुवात करावी लागेल’, असा टोला फडणवीस यांनी लगावला.नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवार साहेबांचा नैतिकतेशी संबंध तरी आहे का? त्यांनी भाजपाला नैतिकता शिकवायचं ठरवलं तर कठीणच होईल. त्यासाठी इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचं सरकार कसं पडलं, येथून सुरुवात करावी लागेल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायचे नसते,’ असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.
उद्धव ठाकरेंबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. नरेंद्र मोदीजींचे फोटो लावून जे निवडून आले आणि केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचार, युती आणि पक्ष सोडला, ते कोणत्या नाकाने नैतिकता सांगतात? निकाल त्यांच्या बाजूने असेल तर त्यांनी आनंदोत्सव करावा, असा टोला फडणवीसांनी लगावला.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय, विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेणार? फडणवीस म्हणाले…
सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे यासंदर्भातील सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. ठराविक कालावधीत तो घ्यावा, असंही सांगितलं आहे. त्यामुळे अशाप्रकारे अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर ते ‘फ्री अँड फेअर’ न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडतील. ते स्वत: एक निष्णात वकील आहेत. जे कायद्यात आहे, संविधानात आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे, त्यानुसारच ते निर्णय घेतील,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.