कोण आहेत सिद्धरामय्या?
सिद्धरामय्या यांनी २०१३ ते २०१८ या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. सध्या ७५ वर्षीय सिद्धरामय्या कर्नाटक विधानसभेत विरोधीपक्ष नेते आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसने ११३ पेक्षा अधिक जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले, तर सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती असू शकतात.
सिद्धरामय्या यांनी १९७८ मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भारतीय लोक दलाच्या तिकिटावर १९८३ मध्ये ते पहिल्यांदा आमदारपदी विराजमान झाले. नंतर त्यांनी सत्ताधारी जनता पक्षात प्रवेश केला. १९८५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मंत्रिपद भूषवलं. १९९६ मध्ये त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली.
२००५ मध्ये एचडी देवेगौडा यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांना जेडीएसमधून हाकलण्यात आले. स्थानिक पक्षांना कर्नाटकांना यश मिळत नसल्याने त्यांनी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा ‘हात’ हाती धरला. ते एकूण आठ वेळा आमदारपदी निवडून आले आहेत, तर तीन वेळा त्यांना पराभवाचा धक्का बसला.
सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनांमधून अनेक बदल घडवून आणले. त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या. अन्न-भाग्य योजनेनुसार सात किलो तांदूळ, क्षीर-भाग्य योजनेनुसार सर्व शालेय विद्यार्थ्यांना १५० मिली दूध आणि इंदिरा कॅन्टीनमुळे राज्यातील गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील उपासमार, शिक्षण, महिला आणि बालमृत्यू यासारख्या समस्यांशी झुंजण्यासाठी योजना आणल्या. यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, महिलांसाठी पंचायतीत सहभाग अनिवार्य करणे आणि गर्भधारणेनंतर १६ महिन्यांपर्यंत महिलांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देऊन महिलांचे सक्षमीकरण केले.
सिद्धरामय्या यांनी मागील सरकारच्या काळातही काही निर्णय घेतले होते, ज्यामुळे लिंगायत, विशेषतः हिंदू मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता कमी झाली. टिपू सुलतानला इतिहासातून हटवून त्याचा गौरव करणे, अनेक पीएफआय आणि एसडीपीआय कार्यकर्त्यांची तुरुंगातून मुक्तता करणे यासारख्या निर्णयांमुळे सिद्धरामय्यांना टीकेला तोंड द्यावं लागलं.