‘उगाच सारवासारव नको’
पहाटेचा शपथविधी हा ठाकरे गटाला दणका होता. ठाकरे गटाला धडा शिकवण्यासाठी हा शपथविधी करण्यात आला होता, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच म्हटलं होतं. त्याबाबत विचारले असता, तुमच्याकडून चूक झाली ती झाली. उगाच कुणाला धडे शिकवू नका. तुम्ही या गोष्टी केल्या. त्यानंतर महाराष्ट्राचं हे राजकारण झालं. उगाच सारवासारव करू नका, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना फटकारलं आहे.
आताच कसं सांगणार?
कर्नाटकाच्या निकाल हे महाराष्ट्रातही बदलाचे संकेत आहेत, असं वाटतं का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं नाही. लगेच काय सांगू शकणार? आता कर्नाटकाचा निकाल लागला आहे. पुढे काय आणि कसं कसं घडतं हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या निकालावरून आताच महाराष्ट्राबाबत भाष्य करता येणार नाही, असं राज यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधींवर स्तुतीसुमने
‘कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राहुल गांधींच्या यात्रेचं कौतुक केलं आहे. दरम्यान, पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी आहे काय?’ असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे.