मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये (Kerala Monsoon) दाखल होतो, परंतु आयएमडीच्या म्हणण्यानुसार, यावेळी विविध कारणांमुळे मान्सूनला चार दिवस उशीर होऊ शकतो. अशा परिस्थितीत केरळमध्ये मान्सून ४ जूनपर्यंत दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे पाहता, आतापर्यंतच्या शक्यतेनुसार मुंबईत ११ जूनपर्यंत मान्सूनला सुरुवात होईल, असे हवामान खात्याचं म्हणणं आहे.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याच्या वेगावर लक्ष ठेवले जाते. केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास उशीर झाला तर याचा अर्थ मुंबईतही मान्सूनवर परिणाम होईल असं नाही, अशी माहिती हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी टाइम्सला दिली. तसेच, मान्सून कधी दाखल होणार हे अनेक घटकांवर अवलंबून असते. गेल्या वर्षीही ११ जूनलाच मान्सून मुंबईत दाखल झाला होता, असंही त्यांनी सांगितलं.
भारतात यंदा सामान्य पाऊस होण्याची शक्यता
दक्षिणेकडील राज्यात २०२२ मध्ये २९ मे, २०२१ मध्ये ३ जून आणि २०२० मध्ये 1 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. भारतात नैऋत्य मान्सून समोर सरकत जाणे हे केरळच्या मान्सूनच्या प्रारंभाद्वारे चिन्हांकित केलं जातं. मान्सून जसजसा उत्तरेकडे सरकतो, तसतसे या प्रदेशांना उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळतो. आयएमडीने गेल्या महिन्यात सांगितले की, एल निनो स्थिती असूनही नैऋत्य मोसमी हंगामात भारतात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
आतापर्यंत उष्माघाताने १२ हून अधिक मृत्यू झाले
तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रात यावर्षी उष्माघाताचे १४७७ रुग्ण आढळून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. २०२२ मध्ये उष्माघाताच्या ७६७ प्रकरणांची नोंद झाली होती. २०२३ मध्ये उष्माघातामुळे डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. फिजिशियन डॉ. जीवन जैन यांच्या मते, उष्माघात टाळण्यासाठी लोकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे. लहान मुलांना उद्यानात किंवा वाहनात दुर्लक्षित ठेवू नये. उन्हात बाहेर जाताना डोके टोपी किंवा कापडाने झाकून ठेवावे. शक्यतो उन्हात बाहेर पडणं टाळावे.