मागील दोन वर्षात सोयाबीनला चांगले दर मिळाले होते त्यामुळे गेल्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणत सोयाबीनची पेरणी राज्यात झाली होती. मात्र, पेरणी नंतर झालेली अतिवृष्टी, ऐन काढणीच्या वेळी झालेला अवकाळी पाऊस आणि सोयाबीनवर आलेला यलो मोझ्याक रोग, खोडकिडीचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात मोठी घात झाली होती. शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त ही चांगल्या दरावरच होती. मात्र, यावर्षी सोयाबीनच्या दराने संपूर्ण हंगामात मोठी निराशा केली आहे.
केंद्र सरकारने सोयाबीनसाठी ४३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. २०२१-२२ च्या तुलनेत यात ३५० रुपयांची दरवाढ केली असली तरी प्रत्यक्षात उत्पादन खर्च यापेक्षाही जास्त आहे. शेतकऱ्यांनी सांगितल्या नुसार यावर्षी सोयाबीनला किमान ७००० रुपये दर मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही संपूर्ण हंगामात सोयाबीनने ६००० हजाराचा टप्पाही गाठला नाही. मागील तीन महिन्यांपासून तर सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण झाली आहे. सोयाबीन पाच हजाराच्या आसपास स्थिर झाले आहेत.
आजच्या दराची माहिती घेतली असता सोयाबीनची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला किमान ४५०० रुपये तर कमाल ५०२० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मंगळावारी सोयाबीनला ५१२० इतका कमाल दर मिळाला होता.
दरवाढीबाबत अनिश्चितता कायम
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणत सोयाबीन साठवून ठेवलेले असले तरी आगामी काळात दरवाढ होण्याची शक्यता कमीच असल्याचे तज्ज्ञ सांगतात. आता नवीन हंगाम तोंडावर आलेला आहे आणि सरकारने अद्यापही सोय DOC आयातीवर निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे दरवाढ होईल की नाही हे निश्चित सांगता येत नाही.