नाशिक : प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांनी बळजबरी घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. त्र्यंबकेश्वर प्रकरणाची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यासोबतच सदर प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता हजरत सय्यद गुलाब शाहवली बाबा दर्ग्याचे सेवेकरी सलीम सय्यद यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली मंदिराच्या पहिल्या पायरीवर धूप दाखवण्याची प्रथा आम्ही बंद करू, असं सांगत पोलीस प्रशासनाची भूमिका अनपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सलीम सय्यद यांनी सांगितले की, मी १० वर्षांचा असल्यापासून या प्रथेबद्दल मला माहिती आहे. माझे वडील हयात असताना ते ही प्रथा पार पाडत असत. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी माझ्याकडे आली. ही जी प्रथा आहे त्या प्रथेला संबल असं म्हटलं जातं. या प्रथेनुसार त्र्यंबकराज महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिराच्या प्रथम पायरीवर उभे राहून प्रार्थना केली जाते आणि नंतर धूप दाखवली जाते. यावेळी माझ्यासोबत फक्त एकच माणूस असतो. मात्र, एखादा आमच्या समाजातील तरुण नजरचुकीने माझ्याबरोबर राहत असेल हे मी नाकारत नाही. धूप दाखवल्यानंतर आम्ही आमच्या मिरवणुकीत सहभागी होऊन दर्ग्याच्या ठिकाणी परत येतो, अशा शब्दांत सय्यद यांनी आपली बाजू मांडली.
दरम्यान, ‘आम्ही कधीही मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला नाही. तसंच मी कधीही त्या मंदिरात गेलेलो नाही. त्र्यंबकराज यांच्यामुळे आम्ही आहोत, अशी आमची भावना आहे. त्यामुळे त्याठिकाणी धूप दाखवली जाते. अशा प्रकारे त्यांना मान देण्यात येतो. मात्र, आमच्या कृतीमुळे कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर आम्हाला माफ करा,’ अशी विनंती हजरत सय्यद गुलाब शाहवली बाबा दर्ग्याचे सेवेकरी सलीम सय्यद यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमाला दोन तास उशीर; महिलांनी चिमुकल्यांसाठी मंडपातच बांधले पाळणे
मंदिर प्रश्नावर राऊत आणि भाजपमध्ये जुंपली!
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही प्रथा शंभर वर्षपूर्वीची जुनी असल्याचे म्हटलं होतं. तसंच अनेक हिंदू बांधव देखील हाजीअली तसेच माहीमच्या दर्ग्यावर जात असतात. देशात बऱ्याच ठिकाणी हा सलोखा आहे. आम्हीही दर्ग्यावर जातो, पंतप्रधान मोदी देखील दर्ग्यावर जात असतात, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही दर्ग्यावर चादर चढवायला जातात, असं म्हणत मोहन भागवत यांना राऊतांनी टोला लगावला. त्यावर भाजपकडून प्रत्युतर देण्यात आलं आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी संजय राऊत हे हिंदूविरोधी आहेत, असा आरोप करत राऊतांनी १०० वर्षांपूर्वीची जुनी प्रथा असल्याचं सिद्ध करून दाखवावं, असं आव्हानही दिलं आहे.