महाविकास आघाडीत जागावाटपाचे कोणतेही सूत्र अद्याप ठरलेले नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी आहे आणि राहील. लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. तसेच २०१९मध्ये आम्ही महाराष्ट्रात ज्या १८ जागा जिंकल्या आहेत, त्या आमच्याकडेच राहतील. तेथे शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या शिवसेनेचे राज्यातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील एक असे आमचे सर्व १९ खासदार निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.
राज्यातील बेकायदा सरकारचा पोपट मेला आहे. या सरकारला बेकायदा ऑक्सिजन दिला जात आहे. परंतु या सरकारचा निर्णय लागणार आहे. हा निर्णय देताना अध्यक्षांनी योग्य निर्णय द्यावा. कारण घटनात्मक पदावर बसलेले व्यक्ती राजकीय असणे धोकादायक आहे. महापालिका निवडणुका घेऊन दाखवा मग लोकच कोणाचा पोपट मेला हे दाखवतील, असेही राऊत म्हणाले.
दंगलीची योजना उधळली
राज्यात दंगली घडवणाऱ्या टोळ्या निर्माण केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वरची घटना खोटी आहे, असे काहीच घडले नाही. त्र्यंबकेश्वरमधील ग्रामस्थांनी दंगली घडवण्याची योजना उधळून लावली. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मूळ प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळण्यासाठी हे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘मतदार यापुढे भाजपला नाकारतील’
‘देशातील मतदार यापुढे भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाहीत. कर्नाटक निवडणुकीपासून या बदलाची सुरुवात झाली आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. यापुढे घटक पक्षांची आघाडी करून निवडणूक लढविण्याचे प्रयत्न राष्ट्रीय पातळीवर सुरू आहेत, याबाबतची बैठक लवकरच निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
‘कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपची प्रतिमा बदलत आहे. यानंतर विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लवकरच विरोधी पक्षांची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले आहे. या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहतील,’ असे पवार म्हणाले. ‘काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विनंतीनुसार कर्नाटकमध्ये सिद्दरामय्या यांच्या शपथविधीला मी उपस्थित राहणार आहे,’ असेही ते म्हणाले. ‘राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे सूत्र निश्चित अद्याप निश्चित झालेले नाही. संजय राऊत हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडू शकतात. मात्र, महाविकास आघाडीमध्ये जागेसंदर्भात चर्चा झालेली नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.