बुलढाणा : आजची पहाट अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करणारी पहाट होती. ते म्हणजे, बुलढाणा आणि अमरावतीमध्ये झालेल्या अपघातामुळे आणि त्या अपघातात निष्पाप १३ जणांचा झालेल्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. पहिल्या अपघाताची बातमी आली ती बुलढाण्यातून, एका भरधाव एसटीची आणि एका कंटेनरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. नंतर आली दुसऱ्या अपघाताची बातमी ती म्हणजे अमरावतीची, हा अपघात रात्रीच झाला होता. या अपघात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात लग्नाहून परतताना झाला.

बुलढाणा अपघात

बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई – नागपूर जुन्या महामार्गावर सिंदखेडराजा जवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. आज सकाळी ६ सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बुलढाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस छत्रपती संभाजीनगरहून वाशिमकडे जात होती. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, १३ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने सिंदखेडराजा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अपघात एवढा भीषण होता की, ट्रकमधील चालक हा मध्ये फसलेला असल्याने त्यालाअक्षरश: कटरच्या साहाय्याने ट्रकचा काही भाग कापून बाहेर काढावे लागले. अपघाताची भीषणता एवढी होती की, एसटी बस ड्रायव्हर साईडने अर्ध्यापर्यंत कापली गेली. अपघाताची भीषणता बघून घटनास्थळी असणाऱ्यांच्या डोळे ओले झाले. एसटी बस अपघातामध्ये एसटी चालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस ही भरधाव वेगाने वाशिमच्या दिशेने जात होती. तर कंटेनर हा सिंदखेडराजाकडे जात होता. यावेळी दोघं वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत ८ जणांना आपला प्राण गमवावा लागला.

Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ८ जण ठार
अमरावती अपघात

अमरावतीमध्ये दर्यापूर – अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर ७ जण जखमी झाले आहेत. रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एकाच कुटुंबातील १२ जण लग्नासाठी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव – सुरजी येथे गेले होते.

लग्न आटोपून ते दर्यापूरकडे येत असताना पाठीमागून एका मोठ्या वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत १२ जण गंभीर जखमी झाले. यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला. बाकीच्यांना दर्यापूर येथे रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टारांना जेव्हा समजलं की परिस्थिती फार गंभीर आहे तेव्हा त्यांनी अमरावतीला नेण्यास सांगितलं. मात्र, वाटेतच दोघांचा देखील मृत्यू झाला. बाकी ७ जणांवर अमरावती जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत. या अपघातात लहान मुलांचा देखील समावेश आहे. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना तातडीने त्यांनी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करत आहेत.

Amravati Accident: लग्नावरुन परतताना रात्री भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा करुण अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here