म.टा.प्रतिनिधी, पुणे : विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खूनप्रकरणी ‘टाडा’कायद्याअंतर्गत (टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टीव्ह ॲक्टव्हिटीज प्रिव्हेंन्शन ॲक्ट) दाखल असलेल्या महाराष्ट्रातील शेवटच्या गुन्ह्यात जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ‘कॉन्स्पिरसी, लँड ग्रॅमिंग हा दहशतवादी कारवायांचा भाग असू शकत नाही,’ असे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी तिघांची मुक्तता केली. जयंत ऊर्फ भाई विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील अशी तिघांची नावे आहेत.
विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा नऊ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी ‘टाडा’नुसार कारवाई केली होती. दुबे खून खटल्यात २००४मध्ये ‘टाडा’ कायद्यातील विविध कलमे; तसेच बेकायदा शस्त्रात्रे बाळगल्याप्रकरणी (आर्म्स ॲक्ट) आरोप निश्चित करण्यात आले होते. तेव्हापासून या खटल्याची शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. दुबे खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव आणि माणिक पाटील या आरोपींना न्यायालयाने या पूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा नऊ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी ‘टाडा’नुसार कारवाई केली होती. दुबे खून खटल्यात २००४मध्ये ‘टाडा’ कायद्यातील विविध कलमे; तसेच बेकायदा शस्त्रात्रे बाळगल्याप्रकरणी (आर्म्स ॲक्ट) आरोप निश्चित करण्यात आले होते. तेव्हापासून या खटल्याची शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. दुबे खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव आणि माणिक पाटील या आरोपींना न्यायालयाने या पूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, भाई ठाकूर, दीपक ठाकूर आणि गजानन पाटील यांच्या संदर्भातील निकाल प्रलंबित होता. या खटल्यात सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. सतीश मिश्रा यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ॲड. सुदीप पासबोला, ॲड. सुधीर शहा, ॲड. रोहन नहार, ॲड. प्रीतेश खराडे, ॲड. सचिन पाटील, ॲड. रोहित तुळपुळे यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
खटल्यातील ठळक बाबी
– हा खटला २००५पासून सुरू झाला होता.
– बुधवारी खटल्याची अंतिम सुनावणी झाली.
– या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते.
– अंतिम सुनावणीत पाच आरोपी होते.
– त्यातील दोघे सुनावणीदरम्यान वारल्याने तिघांविरुद्ध खटला सुरू होता.