जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात अक्षय सुर्यवंशी हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. खासगी कंपनीत तसेच मिळेल ते काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता.
मंगळवारी रात्री १० वाजता तो जेवण करून झोपला होता. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.
आई अक्षयला उठवण्यासाठी गेली असता त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अक्षयचा गळफास घेतलेल्या अवस्थेतला मृतदेह पाहून त्याच्या आईने मोठा हंबरडा फोडला. त्यानंतर घरातील मोठ्या भावानेही घटनास्थळी धाव घेतली व त्यानेही आक्रोश केला.
“अजून त्रास नाही देऊ शकत… म्हणून मी जातोय”
घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. ज्या ठिकाणी अक्षयने आत्महत्या केली, त्या ठिकाणी पोलिसांना अक्षयने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली आहे.
“फक्त वयाने वाढत गेलो पण प्रगती नाही, शिक्षण केलं, पण घरच्यांच्या अपेक्षा, स्वप्न नाही पूर्ण करु शकलो. ओझं झालोय मी, अजून त्रास नाही देऊ शकत, म्हणून मी जातोय, कोणाला जबाबदार धरू नये” असा मिळालेल्या चिठ्ठीतील आशय आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे आणि हरीष डोईफोडे करीत आहे. मयत अक्षयच्या पश्चात आई मालतीबाई आणि मोठा भाऊ ओम असा परिवार आहे.