या हायव्होल्टेज लढतीकडे पाहता आता कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचा धोका आहे. अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर २ सामनाही पावसामुळे ४५ मिनिटांसाठी खंडित झाला होता. नाणेफेक संध्याकाळी ७ ऐवजी ७.४५ वाजता झाली, तर सामना रात्री ८.०० वाजता सुरू झाला. मात्र, पूर्ण सामना खेळला गेला. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील फायनलमध्येही पावसाचा धोका आहे. या सामन्यात पाऊस पडल्यास आणि सामना रद्द झाल्यास काय होईल ते जाणून घेऊया.
गेल्या काही दिवसांत देशातील बहुतांश भागात पाऊस पडला आहे आणि याचा परिणाम आयपीएल २०२३ च्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यावर होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे की २८ मे रोजी अहमदाबादच्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ असेल. चाहत्यांचीही तशीच अपेक्षा असेल. मात्र, Accuweather च्या अहवालानुसार अहमदाबादमध्ये रविवारी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ मे रविवारी संध्याकाळी पावसाची ४० टक्के शक्यता आहे. अहवालानुसार, अहमदाबादमध्ये एकूण दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सूर्यास्तानंतर पावसासह संध्याकाळी ५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.

सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल, असे भारतीय हवामान खात्याने निश्चितपणे सांगितले होते. अशा परिस्थितीत अहमदाबादमध्ये ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळू शकते. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात जसजसा खेळ पुढे सरकत गेला, तसतशी फलंदाजीची परिस्थिती अधिक चांगली झाली. ओलाव्यामुळे गोलंदाजांना पहिल्या काही षटकांमध्ये कमी उसळी मिळत होती. नंतर फलंदाजी करणे खूप सोपे झाले.
फायनलसाठी राखीव दिवस?
आयपीएल २०२२ मध्ये फायनलसाठी राखीव दिवस होता, परंतु बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्लेऑफ वेळापत्रकानुसार यंदा आयपीएल २०२३ फायनलसाठी कोणताही राखीव दिवस नाही. त्यामुळे, IPL 2023 चा अंतिम विजेता अंतिम सामन्याच्या दिवशीच (रविवार, २८ मे) ठरवला जाईल.