धोकादायक बसेसमध्ये प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रवास करताना कधी काय होईल हे सांगता येत नाही . भंगार झालेल्या बसेस रस्त्यावर बिनदिक्कतपणे धावतात हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गंभीर प्रकार आहे. या प्रकाराकडे परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रण अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यांत्रिक व तांत्रिक विभाग यावर काहीही बोलायला तयार नाहीत. सरकारने महिलांना तिकीट दरात सवलत दिल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मात्र, सध्या बहुतांश बसेस भंगार अस्वस्थेत आहेत.
संभाजीनगर ते मलकापूर MH ४० N ९८९१ या एसटी बसची क्लच प्लेट नादूरुस्त असतानादेखील ही बस रस्त्यावर उतरवली जात आहे. क्लच प्लेट नादुरुस्त असल्याने या बसचा वेग हा प्रतिताशी केवळ १५ किमी आहे. दरम्यान, या गाडीत किमान २५ ते ३० प्रवासी होते. बुलढाणा मलकापूर ही बस नादुरुस्त असलेल्या क्लच प्लेट सोबत धावली. यावेळी बसमधील सर्व प्रवाशी जीव मुठीत धरून बसले होते. खराब क्लच प्लेटमुळे या बसचे गियर पडत नव्हते. त्यामुळे पहिल्याच गियर मध्ये ५० कमी पर्यंत प्रवास करावा लागला.
नेहमीचा हा प्रवास एका तासाचा होता त्याला या प्रकारामुळे २ ते ३ तास लागले. दुपारच्या वेळी ही बस कमी वेगाने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांनी वाहन चालक आणि वाहकाकडे तक्रार केली असता यावर आमचा नाईलाज आहे, असे चालक आणि वाहकानी सांगितले. एकूणच अशा प्रकारच्या भंगार बसेसमध्ये प्रवास करणे किती जिकरीचे झाले आहे, हे यावरून स्पष्ट होतं आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन राज्यातील एसटी भंगार बसेस काढून टाकाव्यात आणि नवीन बसेस द्याव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.
विशेष म्हणजे मलकापूर डेपोच्या दोन गाड्या संभाजीनगर ते मलकापूर दरम्यान नादुरुस्त अवस्थेत रस्त्यात उभ्या होत्या. इतक्या लांब पल्ल्याच्या फेऱ्यांनाही मलकापूर डेपो भंगार गाड्या वापरतात हे धक्कादायक आहे. एकीकडे एसटीने प्रवाशांची संख्या वाढविण्याकरता सवलतीचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे लालपरीच्या तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष करत प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार एसटी महामंडळाकडून त्वरित बंद व्हावा अशी मागणी होत आहे.