म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई लोकल विलंबाने धावत असल्याने लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने आपली भूमिका मांडली आहे. नियमित आणि विशेष मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावत असल्याने ४० टक्के लोकल फेऱ्या विलंबाने धावतात. रेल्वे फाटक खुले असणे, आपत्कालीन साखळीचा गैरवापर, रुळांवर होणारे रेल्वे अपघात यांमुळे एकूण २४ टक्के लोकल फेऱ्या विलंबाने धावतात, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह दक्षिण भारतातून येणाऱ्या विशेष आणि नियमित मेल-एक्स्प्रेस फेऱ्या विलंबाने मुंबई उपनगरी हद्दीत दाखल होतात. याचा परिणाम लोकल फेऱ्यांच्या वक्तशीरपणावर होतो. यावर उपाय म्हणून मेल-एक्स्प्रेस वाहतुकीसाठी कल्याण आणि पनवेलमध्ये विशेष टर्मिनसची निर्मिती करण्यात येत आहे.

Balu Dhanrokar Passed Away : खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा
१०० गाड्यांना १० मिनिटांचा विलंब

दिवा, टिटवाळा, चुनाभट्टी, शिवडी या ठिकाणी रेल्वे फाटक आहेत. रेल्वे फाटक खुले राहिल्याने लोकल वाहतूक खोळंबते. लोकल वक्तशीरपणातील १४ टक्के विलंब यामुळे होतो. लोकल येऊन उभी राहिल्यानंतरही फाटकातून वाहनांची वर्दळ सुरू असते. यामुळे रोज सुमारे १०० लोकल फेऱ्यांना सरासरी १० मिनिटांचा विलंब होतो. फाटक बंद करण्यासाठी पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे. दिवा स्थानकात पूल उभारण्याचे काम सुरू आहे.

आपत्कालीन साखळीचा गैरवापर

मेल-एक्स्प्रेसमधील आपत्कालीन साखळीचा विनाकारण वापर झाल्याने रोज २५ लोकल फेऱ्या विलंबाने धावत आहेत. साखळीचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांकडून चुकीच्या रेल्वेगाडीत प्रवेश केला, सहप्रवासी फलाटावर राहिला, अशी कारणे देण्यात येतात.

रुळांवरील अपघातांमुळे ब्रेक

रेल्वे रुळांवर लोकलच्या धडकेत रोज तीन मृत्यू होतात. असा अपघात झाल्यानंतर सरासरी १० मिनिटे लोकल थांबवली जाते. यामुळे सुमारे सहा टक्के लोकल फेऱ्या विलंबाने धावतात.

२२ टक्के अन्य कारणे

सिग्नल आणि ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, रेल्वे स्थानकादरम्यान पायाभूत सुविधा उभारताना कार्यान्वित करण्यात आलेली वेगमर्यादा, रूळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे लोकल विलंबाने धावतात. लोकल वक्तशीरपणामध्ये या कारणांचे प्रमाण २२ टक्के इतके आहे.

मध्य रेल्वेची स्थिती

रोजच्या एकूण लोकल फेऱ्या – १,८१०

मुख्य मार्ग – ८९४

हार्बर मार्ग – ६१४

ट्रान्सहार्बर – २६२

बेलापूर-खारकोपर मार्ग – ४०

लांब पल्ल्यांच्या रेल्वे फेऱ्या – २००

रुळांवरील अपघात रोखण्यासाठी रुळांजवळ सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहेत. रूळ ओलांडणी बंद करण्यासाठी पादचारी पुलांची उभारणी करण्यात येत आहे. आपत्कालीन साखळीचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

– डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Balu Dhanorkar: शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, खासदारकीसाठी फिल्डिंग लावली, धानोरकर २०१९ ला किंग ठरले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here