गोसावी यांच्या घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने तो धुमधडाक्यात साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं होत यामुळे लग्न लक्षात राहावं आणि जोरात व्हावं यासाठी लग्नाच्या आधी शशिकांत – प्रियांका आणि नवनाथ – संजना या वधूवरांचं हेलिकॉप्टरमधून मंगल कार्यालयात आगमन करण्याचा ठरवण्यात आलं. पण नंतर अशआ एन्ट्रीऐवजी महालक्ष्मी, ज्योतिबावर पुष्पवृष्टी करावी असं सुचवलं आणि त्यानुसार प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली.
दुपारच्या मुहूर्तावर दोन्ही जोडप्यांचं लग्न पार पडलं आणि यांनतर तीन वाजता दोन्ही वधू-वर हे अमर सूर्यवंशी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दुपारी ३ वाजता बसले आणि अंबाबाई मंदिराकडे रवाना झाले. वातावरण खराब असल्याने त्यांनी पाऊण तासातच प्रथम अंबाबाई मंदिर आणि नंतर ज्योतिबावर पुष्पवृष्टी केली. तसंच सहजीवनाचा प्रवास सुखकर व्हावा अशी मनोभावे प्रार्थना केली.
कोरोची येथील प्रियंका माळी यांचे बंधू राज यांनी बहिणीच्या विवाह सोहळ्यानंतर अंबाबाई आणि ज्योतिबावर हवेतून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी २३ मे रोजी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार करवीरचे प्रांताधिकारी, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी तसंच करवीर आणि पन्हाळा तहसीलदारांनाही यासंदर्भात कळवण्यात आलं होतं. उजळाईवाडी येथील भारतीय विमान प्राधिकरणच्या संचालकांनीही हिरवा कंदिल दाखवल्यानंतर या नवदांपत्याने विवाहबध्द होताच हेलिकॉप्टरमधून अंबाबाई आणि ज्योतिबावर पुष्पवृष्टी केली. पुष्पवृष्टी करण्यासाठी हेलिकॉप्टर प्रवासासाठी तब्बल सव्वा लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या लग्नाची कोल्हापुरात एकच चर्चा सुरू आहे.