अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यासह मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील अडीच वर्षे सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोणतेही निर्णय घेत नव्हते. आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या दिवसापासून निर्णय घेण्यास सुरवात झाली. हे सर्व निर्णय सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून घेण्यात आले. शेतकरी सुखी झाला पाहिजे हाच आमचा उददेश आहे. निळवंडे धरणाचे काम ५३ वर्षे रखडले. बरं झालं आपलं सरकार आलं, त्यामुळे तरी ते मार्गी लागले. अन्यथा अद्याप ते रखडले असते. या धरणाच्या पुढील कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्याचे अर्थमंत्री फडणवीसही येथे आहेत. त्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत. मी फक्त सांगतो, ते लगेच तिजोरी उघडून पैसे देतात. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनीही चिंता करू नये, त्यांना मोबदला आणि पुढील कामासाठी निधी मिळणार यात शंका नाही, असेही शिंदे म्हणाले.
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, याचा अभिमान आहे. जेव्हा गावी जातो, तेव्हा मीही शेती आणि मातीत रमतो. मात्र, माझ्यावर हेलिकॉप्टरने फिरतो, अशी टीका विरोधक करतात. शेतकऱ्यांची प्रगती होऊ नये काय? त्यांच्या मुलाने हेलिकॉप्टरमधून फिरू नये काय? असे शिंदे म्हणाले. भिवंडीत एका शेतकऱ्याने स्वत:चे हेलिकॉप्टर घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यापूर्वीच्या सरकारला निर्णय लकवा झाला होता. त्यामुळे निर्णयच होत नव्हते. आमचे सरकार आल्यापासून वेगाने निर्णय व्हायला लागले. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय या सरकारने घेतले आहेत. आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत, मागील सरकारच्या कामाशी आमची तुलना केली तर आही किती तरी पटीने पुढे आहोत. निळवंडे प्रकल्प हा माझ्या जन्माच्या आधीचा आहे. तेव्हा आठ कोटींचा असलेला प्रकल्प आता पाच हजार कोटींचा झाला. याला १९९५ मधील युतीच्या सरकारच्या काळात गती मिळाली. २००३ ते २०१७ पर्यंत तो रखडला. २०१७ मध्ये आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि प्रकल्पाने गती घेतली. तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते होते. त्यांनी तसेच ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी यासाठी मोठे सहकार्य केले, असेही फडणवीस म्हणाले. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, की या धरणाच्या बाबतीत यापूर्वी काय झाले, ते आता कालव्यातून वाहत असलेल्या पाण्यासोबत सोडून देऊ. स्वच्छ मनाने पुढे जाऊन काम करीत राहू, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.