रत्नागिरी : सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या उचाट गावातील आईनाच्या झाडावरील रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आता कोकणामध्ये राजापूर-लांजा तालुक्यातील शेतकर्‍यांकडून तुती लागवडीच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर केली जात आहे. शेतकर्‍यांचा हा रेशीम शेतीचा नाविण्यपूर्ण प्रयोग यशस्वी होत असताना त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेशीम संचलनालयाने कोकणासाठी स्वतंत्र रेशीम विभागाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्याला शासनाकडून मान्यता मिळाल्यास स्वतंत्र रेशीम विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल. जगभरामध्ये हापूस आंबा, काजू पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणामध्ये रेशीम शेती आणि त्यावर आधारलेले उद्योग भविष्यामध्ये अधिक बहरताना दिसणार आहे.नागपूर येथील रेशीम संचलनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांच्या राजापूर-लांजा येथील शेतकर्‍यांनी केलेली तुती लागवड आणि रेशीम शेतीला भेट दिल्यानंतर कोकणाकरीत स्वतंत्र रेशीम विभाग उभारण्याच्या हालचालींना खर्‍या अर्थाने वेग आला आहे. रेशीम संचालयानालयातर्फे शासनाला सादर करण्यात आलेल्या स्वतंत्र कोकण विभाग रेशीम कार्यालय निर्माण करण्याच्या प्रस्तावामध्ये आस्थापना निहाय कर्मचारी संख्यादेखील त्यात नमूद करण्यात आली आहे.शेतीमध्ये विविध नवनवीन प्रयोग करून शेतीला उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राजापूर आणि लांजा तालुक्यातील शेतकर्‍यांनी एकत्र येत राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाची स्थापना केली आहे.या गटाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी रेशीम शेती करण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष रेशीम निर्मितीच्यावेळी सोडण्यात येणार्‍या रेशीम अळ्यांना खाद्यासाठी वापर करण्यात येणार्‍या पाल्यासाठी तुतीची लागवड केली आहे. खरवते, सौंदळ, कोळंब, करक, गोठणेदोनिवडे, ओझर, जांभवडे, आरगाव या ठिकाणी ही तुतीची सुमारे सात एकर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. या शेतकर्‍यांना दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या लांजा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुदेश चव्हाण, महेश महाले, संदीप देशमुख यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. गडहिग्लज अंडीपुंज निर्माण केंद्राचे रेशीम अधिकारी अनिल संकपाळ, जेष्ठ तांत्रिक सल्लागार डॉ. भगवान खंडागळे, माजी रेशीम विकास अधिकारी रमेश हांडे यांचेही त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. राजापूर-लांजा तालुक्यातील माजी सैनिक वासुदेव घाग, राजाराम पाटेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे आणि अमर खामकर या प्रगतशील शेतकर्‍यांनी तुतीची लागवड करून त्या माध्यमातून कोकणामध्ये रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. विविध समस्यांना सामोरे जातानाही त्यांनी सुमारे दोनशेहून अधिक अंडीपुंज आणि १५० हून अधिक कोषनिर्मिती केली. त्यामध्ये गोठणे दोनिवडे येथील युवा शेतकरी हनुमंत विचारे यांनी तब्बल १० अंडी पुंज मागे ४८० काऊंट असलेल्या ए ग्रेडची २२ किलो कोष निर्मिती केली होती. रेशीम शेतीकरीता राज्याच्या इतर भागात मनरेगातून अनुदान देण्याची तरतूद आहे. मात्र, कोकण हा अपारंपारीक भाग असल्याने मनरेगा अनुदान योजनेची अंमलबजावणी होण्यामध्ये अडचणी येत होत्या. मात्र, शेतकर्‍यांचा उत्साह पाहता राजापूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी आणि विद्यमान तालुका कृषी अधिकारी सुहास पंडीत यांनी मनरेगा मुल्यांकनाकरीता मनुष्यबळ पुरविण्यासाठी अपेक्षित सहकार्य करण्याचे ठरवले आहे. सद्यस्थितीमध्ये मनरेगाचा पर्याय उपलब्ध नसल्याने सिल्क समग्र-२ नावाच्या योजनेत टाईप-१ प्रकारातील शेड उभारण्यासाठी अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीमध्ये ही शेतकरी शेड उभारणीसाठी बांबूचा उपयोग करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here