या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र काशीराम ध्रुवे (वय ४०, हनुमंत टाकू मुंडी, मध्य प्रदेश) असं मयत तरुणाचं नाव आहे. तर ओमजय जगदीश सुरेश रघुवंशी (रा. हादरा, मध्य प्रदेश) असं आरोपीचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी माधव कचरू मोठे (वय ३६ रा. धारला ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून धारला गावात त्रिंबक झांबु सोनवणे यांच्या शेतामध्ये मयत जितेंद्र आणि आरोपी ओमजय हे दोघेही कामावर होते. दोघेही नेहमीप्रमाणे काम करत होते. दरम्यान, दोघांनी २९ तारखेला रात्री पार्टी करण्याचा बेत आखला. यामध्ये त्रिंबक सोनवणे यांच्या शेतात मटन आणि दारूची पार्टी ठेवण्यात आली.
रात्री ११ वाजता सुरू झालेल्या पार्टीमध्ये दोघांनीही येथेच दारूचा आनंद घेतला. दरम्यान, मटनाचे पीस जास्त कोण खाणार यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या वादाचं रूपांतर शिवीगाळमध्ये झालं. ओमजय ने जितेंद्रला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी ओमजयने जवळ असलेल्या लोखंडी रॉड घेऊन जितेंद्रला डोक्यात पायावर मारहाण करून गंभीर जखमी केलं. या मारहाणीत जितेंद्रचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिताराम मैत्री हे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचासह पंचनामा केला आणि मयताला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी आरोपी ओमजय विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.