प्रकाश नानासाहेब जाधव असे मयत महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली आहे.
परभणी तालुक्यातील त्रिधारावाडी येथील रहिवाशी असलेले प्रकाश जाधव हे महापालितेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत होते. २ जून रोजी परभणी वसमत रोडवरील असोला शिवारात जिजाऊ स्मारकाजवळ पाईपलाईनच्या व्हॉल्वचे लीकेज होऊन पाण्याचा अपव्यय सुरु होता. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर मनपाने दुरुस्तीला सुरुवात केली.
जेसीबीच्या सहाय्याने लीकेजच्या ठिकाणी दहा ते बारा फूट खोल खड्डा खोदण्यात आला. यानंतर दुरुस्तीसाठी प्रकाश जाधव हे खड्ड्यात उतरले. मात्र काम करत असताना अचानक त्यांच्यावर मातीचा ढिगारा आला. काही वेळाने जाधव यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर, मिर्झा तनवीर बेग, हेमंत डापकेकर प्रविण हटकर, बालाजी सोनुले शेख इस्माईल यांनी रुग्णालयात भेट दिली.
दरम्यान प्रकाश जाधव हे नियमित पाईपलाईनची पाहणी व देखभाल करण्यासाठी येत असल्यामुळे परिसरातील रहिवाश्यांसोबत त्यांचा चांगला परिचय होता. पहाटे कर्तव्यावर येत असताना जाधव हे रोज श्रीक्षेत्र त्रिधारा येथे आरती करूनच कामाला जात असल्याचे अनेक भाविक सांगत होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माजी मनपा सभापती सचिन देशमुख यांनी मयत प्रकाश जाधव यांच्या कुटुंबीयांना नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पाच लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.