अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या घोषणेवर विविध प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आमचे आणि आपलेही श्रद्धास्थान हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते. त्या घोषणेला तुम्ही हरताळ फासत आहात. म्हणजे त्यांचे नेतृत्व तुम्ही अमान्य करता आहात का?’ असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

चौंडी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी नामांतराची घोषणा केली. त्यावर शिवसेनेचे जाधव यांनी भूमिका मांडली आहे. जाधव यांनी म्हटले आहे, १९९५ मध्ये नगरच्या वाडीया पार्क मैदानावर झालेल्या सभेत आमचे आणि आपलेही श्रद्धास्थान हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते. त्या घोषणेला तुम्ही हरताळ फासत आहात. म्हणजे त्यांचे नेतृत्व तुम्ही अमान्य करता आहात का? केवळ मतांच्या राजकारणापायी शिवसेनाप्रमुखांचा आदेश तुम्ही मानत नाहीत आहात याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? असा सवाल विचारण्यात आला.

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आले. यावरून महाराष्ट्रभर गदारोळ झाला ही राजकीय चूक झाकणासाठी शहराचे नाव बदलण्याचा खटाटोप राज्य सरकारने केला आहे. नगर शहराचे नाव बदलताना आपण सामान्य नगरकरांना विश्वासात घेतले होते का? केवळ धनगर समाजाची मतं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा घाट घालण्यात आला, याचा आम्ही निषेध करतो, असंही जाधव म्हणाले.

शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, द्वारकामाई मंदिर दर्शन वेळेत बदल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचे आहेच, पण अहमदनगर शहरालाही ५३३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. निजामशाहीत हे शहर वसवण्यात आले. शहरापासून जवळच बुऱ्हानगर हे अंबिका मातेचं जागृत ठाण आहे. तुळजाभवानीच्या जगदंबा मातेचं हे माहेर आहे. असा पुराणात आणि देवी माहात्म्यात उल्लेख आहे. त्यामुळे नगरचे नाव बदलून अंबिकानगरच करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे नगर शहराच्या विकासात राज्य सरकारने कोणते योगदान दिले आणि नगर शहराला किंवा जिल्ह्याला असे विशेष काय दिले की ते परस्पर नगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा हक्क सांगतात ? असा सवालही जाधव यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंचा हा निष्ठावंत कचाट्यात! मुख्यमंत्री शिंदे आणि राणेंचा राजकीय गेम प्लॅन उघड
त्यांनी पुढे म्हटले आहे, धनगर समाजाच्या भावना यांचा आम्ही आदरच करतो. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे सुंदर शहरे बनवली. त्याप्रमाणे अहमदनगर जवळ एक स्मार्ट सिटी उभारून त्याला त्यांचे नाव दिले असते तर छान झाले असते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शहरांची नावे बदलण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीमध्ये या नामांतराला स्थगिती दिली आहे. वास्तविक धाराशिव, छत्रपती संभाजीनगर ही नावे बदलण्याची घोषणा अनेक वेळा झाली पण ती प्रत्यक्षात उतरली नाही. त्यावरून सत्तांतर झाले आणि पुन्हा नावे पूर्ववत झाली. अहमदनगरबाबतही तेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पोळी न भाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशा नुसार अंबिकानगर नाव द्यावे, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here