अकोला : समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरांना झुगारत अकोला शहरातील विधवा आणि घटस्फोटित महिलांनी वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाचे पूजन केले. यावेळी वडपूजन करताना अनेक महिला भावूक झाल्या होत्या. तर काहींना अश्रू अनावर झाले होते. आजही विधवांना प्रथमतः घरातून आणि समाजातून अनेक मर्यादांना सामोरे जावे लागते. आजही विधवांचे वटपौर्णिमा पूजन समाजात मान्य नाही. त्यामुळे या महिला वड पूजनासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना घेऊ दिला जात नाही. अशा गंभीर परिस्थितीत अकोल्यात ‘स्त्री विकास फाउंडशेन’ या प्रवाहाविरुद्ध लढा दिला अन् या अनोख्या उपक्रमाला सुरूवात केली. ही संस्था मागील काही वर्षापासून विधवा महिलांसाठी वटपौर्णिमा पूजनाचे आयोजन करीत आहे.

विधवांच्या सन्मानार्थ झालेल्या वट पूजनासाठी स्त्री विकास फाउंडेशनच्या संस्थापक वैष्णवी दातकर यांच्या नेतृत्वात अनेक महिलांनी पुढाकार घेतला अन् वटपौर्णिमा पूजन करुन विधवांना शुभेच्छा दिल्या. पूर्वी ‘ती’ पतीच्या निरोगी आयुष्यासाठी अनेक व्रते करायची. पण अचानक त्यांची साथ सुटली. पतीचा मृत्यू झाला, पतीने पत्नीला सोडले किंवा घटस्फोट दिला. यात तिचा काही दोष नसतानाही समाजमनाकडून फक्त स्त्रियांनाच काही व्रत-वैकल्ये नाकारली जातात. मंगल सण,समारंभापासून त्यांना दूर ठेवले जाते.

मात्र, यात आमचा काय दोष? आनंदी जगण्याचा अधिकार आम्हालाही आहे. आम्हालाही इतरांसारख्या भावना आहेत. आम्ही आयुष्यभर अपमानास्पद वागणूक का सहन करायची? असे परखड प्रश्न समाजाला विचारत अकोला शहरातील विधवा आणि घटस्फोटित महिलांनी परंपरागत रूढीची बेडी तोडून आज ‘वटपौर्णिमा’ अभिनवतेने साजरी केली. पतीच्या मृत्यूनंतर हिरावलेले हळदी-कुंकवाचे क्षण पुन्हा अनुभवताना या महिलांचे अश्रू अनावर झाले होते.

वाऱ्याची दिशा बदलली, वचपा काढण्यासाठी भालकेंना ऑफर, पवारांच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं!
अनेक महिला झाल्या भावुक

समाजातून मान्यता नसताना सुद्धा अनिष्ट सामाजिक बंधनांना झुगारत सुरू असलेल्या या समाज सुधारणेबाबत उपस्थित विधवा महिलांनी यावेळी आभार व्यक्त केले. या दरम्यान, अनेक विधवा महिला वडपूजन करताना भावूक झाल्या होत्या. अकोल्याच्या स्त्री विकास फाउंडेशनचं काम राज्यभर राबवून याला कायदेशीर मान्यता दिल्यास या विधवा महिलांवरील सामाजिक दडपण नक्कीच दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

सावकाराने ३ हजारांसाठी हात मोडला, मजूर पोलिसांत गेला म्हणून जिवानिशी मारलं, घटनेने लातूर हादरलं
पूजा करताना महिलांचे मन हरखून गेले

नियतीने दुःख पदरात टाकलेल्या ‘या’ महिलांना इतर स्त्रियांनी सांभाळून घेण्याची आजच्या काळाजी गरज आहे. मात्र, दुर्दैवानं तसं होताना दिसत नाहीये. माझ्या पतीच्या निधनानंतरही मी वटपौर्णिमेच्या पूजेत खंड पडू दिला नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी स्वतः सार्वजनिक ठिकाणी वडाची पूजा केली. माझ्याप्रमाणे इतर महिलांनाही वटपूजा करता यावी, यासाठी यंदा उपक्रम घेतला. जवळपास दहा ते पंधरा पूजा करताना महिलांचे मन हरखून गेले होते. यापुढे असंख्य महिला उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा स्त्री विकास फाउंडेशनच्या संस्थापक वैष्णवी दातकर यांनी व्यक्त केली.

नादच खुळा! अकोला पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानिवृत्त, अख्खं पोलीस स्टेशन पोटभर नाचलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here