लोचना यांचा आव्हई येथील ज्ञानेश्वर उध्दव पवार यांच्यासोबत १२ वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन अपत्य देखील झाली. मात्र, मागील काही दिवसापासून लोचना यांच्या पतीला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे पती कामधंदा न करता “माहेरहून पैसे घेऊन ये”, असं म्हणत विवाहितेला मारहाण करत होता. सासू-सासरे यांनी देखील विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.
या त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी या विवाहितेनं विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटवलं होतं. मात्र, या घटनेनंतरही सासरकडील मंडळींकडून होणारा त्रास काही कमी झाला नाही. अखेर या त्रासाला कंटाळून लोचना यांनी आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
मृत महिलेच्या मुलाने ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर पती ज्ञानेश्वर, सासु सखुबाई, सासरा उध्दव श्रीपती पवार हे गावातून पसार झाले. पोलीस पाटील संदीप सोनवणे यांनी पूर्णा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरिक्षक सुभाष मारकड, साहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड, साहाय्यक पोलीस उपनिरिक्षक चव्हाण, जमादार अमर चाउस यांनी घटनास्थळी भेट दिली.
मयत विवाहितेच्या माहेरकडील लोक आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर प्रकरणी मयत महिलेचा भाऊ नानाराव भाऊराव जामगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती आणि सासु-सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.