एम्समधील शवागाराच्या बाहेर एका स्क्रीनवर मृतदेहांचे फोटो दाखवले जात आहेत. यामध्ये आपल्या घरातील व्यक्तीचा फोटो आहे का, हे पाहण्यासाठी मृतांचे नातेवाईक या स्क्रीनला खिळून बसलेले आहेत. परंतु, अनेक तास टक लावून पाहिल्यानंतरही यापैकी अनेकांच्या पदरी निराशाच पडत आहे. या भीषण अपघातात अनेक मृतदेहांची अवस्था ओळख पटवण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला शेवटचं तरी पाहता येईल की नाही, याबाबतची आशा तासागणिक धुसर होत चालली आहे.
बालासोर जिल्ह्यात झालेल्या या भीषण अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि हावडा एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले होते. यावेळी एक्स्प्रेस गाडी आणि मालगाडीची जोरदार टक्कर झाल्यामुळे ट्रेनच्या डब्ब्यांचा चेंदामेंदा झाला होता. इतक्या जोरदार धडकेमुळे ट्रेनमधील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी अनेक मृतदेहांचे हातपाय धडावेगळे झाले आहेत, अनेक मृतदेहांचे अवयव आणि चेहरे छिन्नविछिन्न झाले आहेत. या अपघातावेळी उच्च दाबाचा विद्युतप्रवाह असलेली ओव्हरहेड वायर खाली आली. त्यामुळे जवळपास ४० प्रवाशांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाचा हा फेरा एवढ्यावरच थांबला नाही. तर या ४० जणांचा मृत्यू झाल्यानंतरही बराच काळ त्यांच्या शरीरातून विद्युतप्रवाह वाहत राहिला. त्यामुळे या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झालेला आहे. परिणामी या मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना १०१ कलेवरांच्या गर्दीतून त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कशी शोधून द्यायची, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. यावर उपाय म्हणून आता रुग्णालय प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने गोळा करायला सुरुवात केली आहे. त्याच्याआधारे मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन ओळख पटवण्याचे काम सुरु झाले आहे.