भुवनेश्वर: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हजारपेक्षा अधिक जण जखमी झाले. तीन रेल्वे गाड्यांच्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. इतका भीषण अपघात कसा घडला यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सीबीआयकडून सुरू आहे. दरम्यान एका प्रत्यक्षदर्शीनं खळबळजनक माहिती दिली आहे.बालासोरमध्ये तीन रेल्वेगाड्यांना अपघात झाला. अपघातस्थळापासून २० मीटर अंतरावर असलेल्या मेडिकलचा मालक सौभाग्य रंजन सारंगी (२५) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘अपघातावेळी रेल्वे क्रॉसिंगवर दुरुस्तीचं काम सुरू होतं. रेल्वे रुळांवर १० ते १५ गेटमॅन होते. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम सुरू होतं. अपघात झाला त्यादिवशीही रेल्वे क्रॉसिंगवर काम सुरु होतं,’ असं सारंगी यांनी सांगितलं. मी रोज संध्याकाळी दुकान बंद करुन निघतो. तेव्हा तिथे दुरुस्तीचं काम सुरू असतं. रुळांच्या चौपदरीकरणाचं कामदेखील गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी दुकानदारानं दिली. बालासोरमधील बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये २७५ जणांचा मृत्यू झाला, तर १ हजारपेक्षा अधिक जण जखमी झाले. कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकापासून तमिळनाडूच्या चेन्नईपर्यंत धावते. अपघातात या एक्स्प्रेसचे १५ डबे रुळावरुन घसरले. यातील ७ डबे पूर्णपणे उलटले. सिग्नलमध्ये झालेल्या गोंधळामुळे अपघात झाल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकानं हिरवा सिग्नल पाहिला. त्यामुळे त्यानं एक्स्प्रेस पुढे नेली. एक्स्प्रेसचा वेग १३० किमी प्रतितास होता. याच वेगात एक्स्प्रेस मालगाडीला धडकली. त्यामुळे एक्स्प्रेसचे अनेक डबे घसरले आणि शेजारच्या रुळांवर जाऊन पडले. तितक्यात त्या रुळांवरुन शालिमार एक्स्प्रेस धावली. तिनं कोरोमंडलच्या डब्यांना धडक दिली. यामध्ये शालिमारचे डबे रुळांवरुन घसरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here