वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, ओडिशातून नवी दिल्लीत परतलेले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या.

बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी झालेला हा भीषण रेल्वे अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील हस्तक्षेपामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. त्यामागे घातपाताचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर, रेल्वे बोर्डाने अपघाताच्या सीबीआय तपासाची शिफारस केली होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली होती. रेल्वे अपघातप्रकरणी बालासोर ‘जीआरपी’ येथे ओडिशा पोलिसांनी ३ जून रोजी एफआयआर दाखल केला होता. प्रक्रियेनुसार सीबीआयने पुन्हा एफआयआर नोंदवून घेऊन, तपास सुरू केला आहे. तपासानंतर याप्रकरणी आरोपपत्र दाखल करताना सीबीआय काही आरोप नव्याने लावू शकते किंवा वगळू शकते.

बालासोर रेल्वे अपघातात मराठमोळे अधिकारी ठरले देवदूत, शेकडोंचा जीव वाचला
पथकाकडून पाहणी

सीबीआयच्या दहा जणांच्या पथकाने बालासोर जिल्ह्यातील रेल्वे अपघातस्थळी रूळ, सिग्नल रूमची पाहणी केली; तसेच बहानगा बाजार रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथकही होते. या पथकाने रेल्वेची विविध उपकरणे कशी काम करतात याची माहिती घेतली. सीबीआय या घटनेतील गुन्हेगारी बाजूचा तपास करणार आहे. ‘सीबीआय सर्व बाजूंनी तपास करणार आहे. तपास यंत्रणेकडून माहिती गोळा केली जात असून, रेल्वेकडून त्यांना संपूर्ण सहकार्य केले जाईल’, असे दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य चौधरी यांनी सांगितले.
खेळ कुणाला दैवाचा कळला? लेकाच्या काळजीनं बाप अपघातस्थळी पोहोचला अन् सुखद धक्का बसला
अपघातातील मृतांची संख्या २८८

भुवनेश्वर : ओडिशा सरकारने रेल्वे अपघातातील मृतांच्या संख्येत मंगळवारी पुन्हा दुरुस्ती केली. ‘सोमवारपर्यंत २७५ मृत्यूंची पुष्टी झाली होती. मात्र, मृतदेहांची पडताळणी केल्यानंतर हा आकडा २८८वर पोहोचला आहे. एकूण २८८पैकी २०५ मृतदेहांची ओळख पटली असून ते त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उर्वरित ८३ मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ते भुवनेश्वरमधील एम्स तसेच अन्य रुग्णालयांत ठेवण्यात आले आहेत’, असे राज्याचे मुख्य सचिव पी. के. जेना यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here