लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथील कापड व्यापारी सुहास गोविंदराव मलफेदवार (वय २२) यांचे नगरपालिकेच्या कॉम्पलेक्समध्ये कापड दुकान आहे. अत्यंत श्रीमंत असलेल्या सुहास यांना आलिशान गाड्यांचा शौक होता. आत्ताही त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्या आहेत.
सतत काही ना काही कामनिमित्त लातुरात आल्यानंतर ते येथील बार्शी रोडवर असलेल्या हॉटेल ग्रँडवर आराम करण्यासाठी थांबत असत. दि. १ जून रोजीही ते आपल्या अन्य दोन मित्रांसह दुपारी साधारण २ ते २.३० वाजेच्या सुमारास हॉटेल ग्रँडवर येऊन थांबले होते. यावेळी त्यांच्यासेाबत असलेला गाडीचा ड्रायव्हर आणि दुकानातील एक कर्मचारी सोबत होते.
ते खालीच हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी थांबले आणि सुहास एकटेच हॉटेलमधील ३१५ नंबरच्या रुमवर आराम करण्यासाठी गेले. दुपारी साधारण ३.३० वाजताच्या सुमारास त्यांनी रुममध्येच जेवण मागवले. त्यानंतर थंड पाण्याची बॉटलही मागवली. मागवलेले जेवण त्यांनी घेतले.
याच दरम्यान, त्यांच्या वडिलांनी त्यांना फोन लावले, परंतु ते फोन घेत नव्हते. अखेर घरातील नातेवाईकांनी त्यांच्या गाडीच्या चालकाला फोन लावला असता त्यांनी सांगितले की ते वर रुममध्ये आराम करत आहेत. परंतु, बराच वेळ फोन रिसीव्ह करत नसल्यामुळे नातेवाईकांनी हॉटेलच्या मॅनजरला चौकशी करण्यास सांगितले.
हॉटेलच्या काऊंटरवरुन त्यांच्या रुममध्ये लँडलाईनवर कॉल करण्यात आला परंतु त्यांनी तोही कॉल घेतला नाही. त्यानंतर शंका आलेल्या हॉटेल स्टाफने रात्री ८.३० वाजताच्या सुमारा मास्टर कीने रुम नं. ३१५ चा दरवाजा उघडला असता, सुहास मलफेदवार यांनी कमरेच्या बेल्टने छताच्या फॅनला गळफास घेतल्याचे आढळून आले.
घटनास्थळावर कुठलीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
पोलिसांनी मयत सुहास यांचे दोन्ही मोबाईल जप्त केले असून त्यांच्या मोबाईलचा डेटा तपासण्यात येत आहे.
सदर घटनेची माहिती तातडीने पोलीसांना आणि सुहास यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मयत सुहास यांच्या नातेवाईकांनी मात्र यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणी लातूराच्या एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे.