दरम्यान, सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात अटकेसारख्या कठोर कारवाईपासून समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत असलेले अंतरिम संरक्षण न्या. अजय गडकरी व न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने आणखी दोन आठवडे वाढवून वानखेडेंच्या याचिकेवरील पुढील सुनावणी २३ जून रोजी ठेवली.
आर्यनच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली, अशा आरोपांबाबत एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने एफआयआर दाखल केल्याने वानखेडे अडचणीत आले आहेत. हा एफआयआर खोटा असल्याचा दावा करत तो रद्द होण्यासाठी वानखेडेंनी याचिका केली आहे. त्यात न्यायालयाने वानखेडेंना अंतरिम संरक्षण दिले आहे. ‘खंडणीखोरी केल्याच्या आरोपांबाबत वानखेडेंविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याने त्यांचे अंतरिम संरक्षण मागे घ्यावे’, अशी विनंती सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून वानखेडेंनी गुरुवारी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्यावरील आरोपांचे खंडन करतानाच एनसीबीवरच गंभीर आरोप केले.
आर्यन खानच्या अटकेमुळे कोर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकल्प खूप चर्चेत आले होते. त्यावेळी अनेक कारणांमुळे वानखेडे यांच्यावर खंडणी व लाचखोरीचे गंभीर आरोप झाले. त्यानंतर नवी दिल्लीस्थित एनसीबी मुख्यालयातून एसईटीची स्थापना करण्यात आली होती. ‘एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांचा माझ्यावर व्यक्तिगत राग होता. कारण जातीय छळाबाबत मी ऑगस्ट-२०२२मध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. म्हणूनच एसईटी स्थापन करून सूडबुद्धीने माझ्याविरोधात अहवाल तयार करण्यात आला. त्याद्वारे माझ्या तपासाबाबत व वर्तणुकीबाबत संशय निर्माण करून आर्यनला क्लीन चीट देण्यात आली’, असा दावा वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात केला. ‘या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यनसोबत जो सेल्फी फोटो घेतला त्याला एनसीबीची संमती नव्हती. आर्यन हा सेलिब्रिटी असल्याने अनेक जण त्याच्यासोबत फोटो घेत होते’, असे स्पष्टीकरणही त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिले.