कोल्हापूर: दोन दिवसांच्या अशांततेनंतर कोल्हापूर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. या बंदच्या दरम्यान सुरु असलेल्या आंदोलनात अचानक राडा सुरू झाला होता.

शहरात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३६ जणांना अटक केली आहे. तर तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूरमधील बजरंग दलाच्या शाखेकडून कोल्हापूर बंदच्या हाकेदरम्यान शिवाजी चौकात बुधवारी हिंसाचार झाला होता. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी ज्या ३५० हून अधिक अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यातमध्ये एकाही हिंदुत्वादी विचारसरणीच्या संघटनेतील कार्यकर्त्याचा किंवा पदाधिकाऱ्याचा समावेश नाही. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ३६ जणांना गुरुवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सर्वांना कोठडी सुनावण्यात आली असून तिघा अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पत्रकारांनी आणि अन्य लोकांनी हिंसाचारादरम्यान शूट केलेल्या व्हिडिओ क्लिपमधून पोलिसांनी या लोकांची ओळख पटवली आहे.

दंगलखोर बाहेरून आले होते की नाही हे आम्ही सध्या सांगू शकत नाही

महेंद्र पंडित, पोलिस अधिक्षक कोल्हापूर

आम्हाला हे लोक दंगल घडवणे, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणारे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणारे आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी आणि सामान्य लोकांचे जीवन धोक्यात घालणारे आढळले आहेत. याबाबत आणखी तपास सुरू असून गरज वाटली तर यात आणखी गुन्ह्यांचा समावेश केला जाईल, असे कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.

आउट होऊन देखील खेळत राहिला अजिंक्य रहाणे, कर्णधार कमिन्सची एक चूक ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकते
या सर्वांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४३, कलम ४२७ (नुकसान घडवून आणणे), कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे), कलम १८८ (आदेशांचे उल्लंघन), कलम १०९ (गुन्ह्यास उत्तेजन देणे) आणि मुंबई पोलिस कायद्यातील कलम ३७ (१) ३ प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करण्यासंबंधी कलम लावण्यात आली आहेत. FIRमध्ये ३५० हून अधिक अज्ञात लोकांना देखील हीच कलमं लावण्यात आली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौक शांत, कोल्हापुरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा गौरव करणाऱ्या सोशल मीडिया स्टेटसवरून बजरंग दलाने कोल्हापूर बंद पुकारल्यानंतर बुधवारी २० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर खबरदारी म्हणून मोबाइल इंटरनेट सेवा ३१ तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनात विविध हिंदूत्ववादी संघटनांचे जिल्हा आणि शहरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. या प्रकरणी शहरातील ३ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण बंदची हाक देणाऱ्या एकाही प्रमुख व्यक्तींवर गुन्हा दाखल झालेला नाही. दंगलखोर बाहेरून आले होते की नाही हे आम्ही सध्या सांगू शकत नाही, असेही महेंद्र पंडित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here