हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांसाठी कमाल तापमानाच्या IMD अंदाज मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सूनच्या आगमनापर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका बसणार आहे. आजपासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पुढच्या ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना उष्णतेचा तडाखा…
मध्य महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात पाऊस तर काही ठिकाणी पावसाच्या सरी अनुभवायला मिळतील. तरीदेखील उन्हाच्या तडाक्यापासून नागरिकांना दिलासा नसणार आहे.
दरम्यान, देशात मान्सूनच्या हालचालींना वेग आला असून आता बिपरजॉय चक्रीवादळाचाही धोका देशाच्या किनारपट्टीवर येऊन ठेपला आहे. हे चक्रीवादळ येत्या ४८ तासांमध्ये आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम पाहायला मिळेल. भारतीय हवामान खात्यांना दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ३ दिवसांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र रूप घेईल. त्यामुळे या चक्रीवादळाचा परिणाम देशासह राज्यातही पाहायला मिळणार आहे.
Monsoon Prediction 2023 : यंदाचा मान्सून हसवणार की रडवणार, वाचा IMD चा हवामान अंदाज
महाराष्ट्रात अलर्ट जारी…
हवामान खात्याकडून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातल्या मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.