रावत यांनी बुधवारी गोडसे याला देशभक्त म्हणून संबोधले होते, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रपित्याचे आडनाव लावत असल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली. ‘गांधीजींची हत्या झाली, हा वेगळा मुद्दा आहे. पण मी गोडसेबाबत जेवढे समजून घेतले आहे आणि वाचले आहे, त्यावरून तोही देशभक्त होता. गांधीजींच्या हत्येशी आम्ही सहमत नाही,’ असे रावत म्हणाले. यावेळी रावत यांनी राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले. ‘काँग्रेसच्या बिघडत चाललेल्या अवस्थेमुळे राहुल गांधी हताश आहेत व त्याच मानसिक तणावातून ते बोलत आहेत. पण जनता मानसिक तणावातून वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींचे विचार कधीच स्वीकारणार नाही’, असेही त्यांनी राहुल यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यांबाबत भाष्य केले.
दुसरीकडे कर्नाटकात काँग्रेसनेही इतिहासाला हात घालत यापूर्वीच्या भाजप सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केलेले धडे वगळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारीच कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडा शालेय पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकल्याच्या वृत्तावरून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली. ‘काँग्रेसचे इतिहासाबद्दलचे आकलन नेहरू-गांधी कुटुंबापुरते मर्यादित आहे. ही कृती म्हणजे काँग्रेसचा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे. ‘घराणेशाही’चा भाग नसलेल्यांना दूर करण्यासाठी देशाच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा काँग्रेसचा मोठा इतिहास आहे’, अशी टीका त्यांनी केली.
‘नथुराम गोडसे याचे गुणगान करणारे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांची भाजपमधून त्वरित हकालपट्टी करा’, अशी मागणी काँग्रेसचे नेते वैभव वालिया यांनी पंतप्रधानांकडे केली. ‘पंतप्रधान मोदी यांच्या मनात गांधीजींसाठी खरोखर स्थान असेल, तर त्यांनी यावेळी निर्णायक निर्णय घेऊन रावत यांना पक्षातून हाकलून द्यावे. तसे न केल्यास गांधीजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांच्याविषयी प्रवचन देणे मोदी यांनी बंद करावे. जागतिक व्यासपीठावर आपली प्रतिमा उजळवण्यासाठी तुम्ही गांधीजींच्या पुतळ्याला फुले अर्पण करता. त्याच वेळी देशातील तुमच्या नेत्यांना शिव्या देण्यासाठी पक्षातूनच उद्युक्त केले जाते. हे नाटक चालणार नाही’, असेही त्यांनी म्हटले.
फुटीरतेला खुले संरक्षण : काँग्रेस
‘गोडसेच्या मार्गावर चालणाऱ्यांनी उभ्या केलेल्या द्वेषाच्या बाजारात हिंसा, फुटीरतावादी राजकारण, अत्याचार, शोषण आणि गैरकृत्यांना खुले संरक्षण आहे. गांधीजींनी दाखविलेल्या मार्गावर चालत जनतेने उभारलेल्या प्रेमाच्या दुकानात सर्वांना आदर, आदर, बंधुता, समता आहे आणि सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. आज गांधीजींचा मारेकरी गोडसे हा देशभक्त असल्याचे सांगत रावत यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी उघडलेल्या द्वेषाचे दुकान समजून घेण्याची गरज आहे. त्याला देशभक्त म्हणणाऱ्यावर कारवाई करण्याची सामूहिक मागणी व्हायला हवी’, असेही काँग्रेसचे वालिया म्हणाले.