म. टा. प्रतिनिधी, मुंबई ः ‘देशाच्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही घटनेवर आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र कोणी धमक्या देऊन आवाज बंद करू शकेल, असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केले.’तुमचा नरेंद्र दाभोळकर करू’ अशी धमकी शरद पवार यांना सोशल मीडियावरून देण्यात आली आहे. त्याबाबत त्यांनी वरील मत व्यक्त केले. ‘राज्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे धमकीची मी चिंता करीत नाही. मात्र ज्यांच्या हातात सत्तेची सूत्रे आहेत. त्यांनादेखील जबाबदारी टाळता येणार नाही’, असेही ते म्हणाले.

शरद पवार धमकी प्रकरणात मोठी अपडेट, तपास गुन्हे शाखेकडे, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
‘खरा मास्टरमाइंड शोधावा’

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाद्वारे धमकी देण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पवार यांना धमकी देण्याचे हे प्रकरण गंभीर असून, केंद्र आणि राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आरोपींना तातडीने गजाआड करावे. तसेच ही धमकी देण्यामागील खरा मास्टरमाइंड शोधावा’, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

काँग्रेसने भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या वर्षा गायकवाड कोण आहेत? पाहा…
‘…तर केंद्र आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार!’

‘राज्यात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मिळालेल्या धमकीचा गांभीर्याने तपास केला पाहिजे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरेवाईट झाल्यास देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री त्याला जबाबदार असतील’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी दिला. सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. पवार यांना आलेल्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स प्रत यावेळी आयुक्तांना देण्यात आली.

‘राज्यात जंगलराज’

‘गेल्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत व प्रामुख्याने राजधानी आणि सुरक्षित शहर असणाऱ्या मुंबई आणि परिसरात दररोज हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. आता तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली नसून शिंदे-फडणवीसांचे जंगलराज सुरू आहे’, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तसेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी शुक्रवारी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here