कोल्हापूर : “आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया”, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं. “१९९९ पासून जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कोल्हापूरची खासदारकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आलेली आहे. या लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव आहे”, असंही ते म्हणाले. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ बोलत होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण झाले.

आमदार मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, “येणारे एक वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. येणारे फक्त एक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी द्या. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. पक्षाच्या विस्तारासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचा. सामान्य माणसांच्या सुखदुःखात जर सहभागी झालो तर आपण या सामान्य माणसांचे होऊन जातो. हा मला सातत्याने आलेला अनुभव आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचा झेंडा सगळ्याच संस्थांवर फडकवा. निवडणुका पुढे घालवण्याचा प्रयत्न म्हणजे पराभवाचीच मानसिकता आहे”, असंही ते म्हणाले.

भारताला किती धावांचे मिळू शकते विजयासाठी टार्गेट, ऑस्ट्रेलिया खेळणार सर्वात सेफ गेम
आमदार राजेश पाटील म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्यात किमान सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजेत. यादृष्टीने कंबर कसून कामाला लागू या. पक्षाची ध्येयधोरणे आणि कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एकसंघपणे काम करूया”. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, “येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा”, या तयारीने सर्वजण कामाला लागूया. त्यादृष्टीने चांगले संघटनात्मक काम करूया.

“आमचे नेते शरद पवारसाहेबांबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे एकेरी बोलत आहेत. उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना माझी नम्र विनंती आहे कि, त्यांनी त्याना समज द्यावी आणि आवर घालावा. शरद पवारसाहेबांना ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत, हे सगळं अखंड महाराष्ट्रासह ऊभा देश बघत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”. असंही हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

“राज्य सरकारच्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला आमच्या शुभेच्छाच आहेत. कारण त्यामधून गोरगरिबांची सेवा होणार आहे. परंतु अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय हे होणार नाही. आयुक्त रामोड यांच्या घरी तब्बल सहा कोटी रोख रक्कम सापडली आहे. तसेच, कालच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संघटनेने दिलेले निवेदन किती गंभीर आहे”, असंही मुश्रीफ यावेळी म्हणाले.

यावेळी माजी आमदार राजीव आवळे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसनराव चौगुले, युवकचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक युवराज वारके, करवीर तालुकाध्यक्ष मधुकरराव जांभळे, माजी स्थायी समिती राजेश लाटकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ शितल फराकटे, डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. आशा शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे, कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील, इचलकरंजी शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे, हातकणंगले विधानसभा अध्यक्ष संभाजीराव पवार, चंगेजखान पठाण आदी प्रमुखांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कोल्हापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी आभार मानले.

रोहित शर्माचा तो एकमेव निर्णय भारताला विजय मिळवून देणार, पाहा नेमकं काय केलं होतं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here