जवाहरलाल नेहरू विद्यापीठ () आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आणि समर्थनार्थ बॉलिवूड सेलिब्रिटी भूमिका घेताना दिसत आहेत. दीपिका पदुकोण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यानंतर आता अभिनेत्री जुही चावला हिने या वादात उडी घेतली आहे. जेएनयूमधील हिंसेवर जुही चावला हिने भाष्य केलं आहे. तिने रिअॅक्ट होण्याआधी नेमकं काय घडलंय ते सबुरीनं समजून घेण्याचा सल्ला दिलाय. ‘गोष्टी तोडणं सोपं असतं, जोडायला वेळ लागतो,’ असं विधान जुहीने केलं आहे. दीपिकाने जेएनयूत जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. नंतर सोनाक्षीदेखील या हिंसेवर बोलली. त्या पार्श्वभूमीवर जुहीचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
या विधानानंतर काही वेळातच जुही ट्विटरवर ट्रेंड होऊ लागली होती. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यानंतर देशभर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्ष आणि सरकारव्यतिरिक्त सेलिब्रिटीजदेखील व्यक्त होऊ लागले. काही जण यामुळे ट्रोल होऊ लागले. दीपिका पदुकोणचा तर प्रदर्शित होऊ घातलेला छपाक सिनेमा तिने घेतलेल्या भूमिकेमुळे अडचणीत सापडला आहे.
अभिनेत्री जुही चावला मुंबईतल्या एका इव्हेंटमध्ये म्हणाली, ‘आपण रिअॅक्ट होण्याऐवजी उत्तर द्यायला सुरूवात करू शकतो का? आपल्याला आधी हे समजून घ्यायला हवं की नेमकं प्रकरण काय आहे आणि जे घडलं त्यामागची पार्श्वभूमी काय आहे. आधी समजून घेऊन मग बोलायला हवं. कोणतीही गोष्ट तोडण्यासाठी वेळ लागत नाही, जोडण्यासाठी लागतो.’
भाजपच्या वतीने आयोजित एका इव्हेंटमध्ये जुही बोलत होती. ती म्हणाली, ‘आपण १२५ कोटी भारतीय आहोत. आपण एकजुटीनं राहणं ही मोठी जबाबदारी आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपण प्रत्येकाकडून उत्तराची अपेक्षा करू शकत नाही. आपल्याला स्वत:बद्दलही विचार करण्याची गरज आहे की आपण काय करत आहोत आणि काय विचार करत आहोत.’
जुहीच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिच्याकडेही मोर्चा वळवला आहे. दीपिकानंतर जुहीला देखील ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, दीपिकाच्या बाजुने अनेक सेलिब्रिटी उभे ठाकले आहेत. दीपिकाने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करत दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिच्या सिनेमाचा पहिला शो पाहण्याचं आवाहन लोकांना केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times