विदर्भात कधी दाखल होणार मान्सून?
यंदा मान्सूनचे आगमन केरळातच उशिरा झाल्याने नियोजित वेळेपेक्षा विलंब झालाय. मात्र, आता लांबलेला मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असला तरी अकोल्यात मात्र सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे. विदर्भात मान्सूनचे आगमन साधारणपणे १६ जूनच्या आसपास होणार आहे. असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मात्र, यंदा स्थिती वेगळी निर्माण झाली असल्यानं मान्सून पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
अकोला जिल्ह्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान वाढले होते. नंतर काही दिवस उन्हाची तीव्रता किंचित कमी झाली. मात्र, शेवटच्या आठवड्यात पुन्हा तापमान वाढतच गेले. जून महिन्याचे १२ दिवस लोटल्यानंतरही सूर्य आग ओकत असल्याचे काल मंगळवारी जाणवले. कारण, हे तापमान ४३.५ अंश सेल्सिअस इतके होते. तर काल ब्रह्मपुरी, गडचिरोली, नागपूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव इथे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे होतं आणि उर्वरित राज्यात तापमान ३६ ते ४२ अंशांच्या दरम्यान दिसून आलं.
अकोला जिल्ह्यात यंदा ४ लाख ६९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आलं. त्यात सोयाबीन २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असून ४ लाख १० हजार ८७२ मे. टन उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान, कापूस १ लाख ६० हजार हेक्टर, ४ लाख ३३ हजार ८८२ मे. टन. तूर ५७ हजार ५०० हेक्टर, ८६ हजार २५० मे.टन. मूग १० हजार हेक्टर, ४ हजार ९५० मे.टन, उडीद ६ हजार हेक्टर, ३ हजार १६२ मे. टन. खरीप ज्वारी ३५०० हेक्टर, ५ हजार ३३ मे. टन याप्रमाणे लागवड क्षेत्र व उत्पादन अपेक्षित आहे.