बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची सुरुवात
BSE बद्दल बोलायचे तर १८५० मध्ये पाच लोकांनी एक पाऊल पुढे टाकले आणि शेअर ब्रोकिंग सुरू केले. आज बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बाजार मूल्यानुसार जगातील ११वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे. १८५० रोजी शेअर मार्केटची सुरुवात वटवृक्षाच्या खाली झाली असे मानले जाते. खरं तर या ठिकाणी प्रामुख्याने कापूस व्यवसायासाठी व्यवहार व्हायचे, त्याचवेळी मुंबईच्या टाऊन हॉलसमोरील या झाडाखाली चार गुजराती आणि एका पारशी व्यक्तीने विविध व्यावसायिकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली. चर्चगेट परिसरातील हरनिमान सर्कलच्या टाऊन हॉलजवळील या झाडाखाली ट्रेडर्स (दलाल) जमवून शेअर्सचा व्यवहार करायचे. पाच वर्षांनंतर म्हणजेच १८५५ मध्ये जेव्हा ट्रेडर्सची संख्या वाढली तेव्हा त्यांनी या कामासाठी एक कार्यालयही विकत घेतले, जे आज ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ म्हणून ओळखले जाते.
दलाल स्ट्रीट कसे प्रसिद्ध झाले?
मुंबईतील मीडोज स्ट्रीट आणि M.G रोड जंक्शनवरही दलाल जमू लागले आणि हळूहळू ही जागा दलाल स्ट्रीट म्हणून प्रसिद्ध झाली. ब्रोकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि १९७५ मध्ये नेटिव्ह शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन अस्तित्वात आली, जी अधिकृत स्टॉक एक्स्चेंजची सुरुवात मानली जाते, जे आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले जाते. त्यावेळी ३१८ जणांनी एक रुपये प्रवेश शुल्कासह संघटना स्थापन केली.
BSE च्या स्थापनेचे श्रेय कुणाला?
मुंबईचे कॉटन किंग म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती प्रेमचंद रायचंद जैन BSE चे संस्थापक मानले जाते, जे नेटिव्ह शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. खरेदी-विक्रीचा प्रकार अशाप्रकारे वर्षानुवर्षे सुरू राहिला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या १० वर्षांनंतर १९५७ मध्ये सरकारने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन कायद्यांतर्गत याला मान्यता दिली. यानंतर बीएसई सेन्सेक्स १९८६ मध्ये सुरू झाला, ज्याचे बेस वर्ष १९७८-७९ होते आणि बेस पॉइंट १०० होता.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराचे महत्त्व
भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची महत्त्वाची भूमिका आहे. विविध क्षेत्रातील ३० मोठ्या कंपन्यांचे शेअर्स इथे सूचिबद्ध असून बीएसईमध्ये ५,००० हून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत. जर्मनी-आधारित ड्यूश बोर्स आणि सिंगापूर एक्सचेंज बीएसईचे धोरणात्मक भागीदार म्हणून संबद्ध आहेत. त्याच्या गुंतवणूकदारांची संख्या आता ११ कोटींच्या पुढे पोहोचली असून जागतिक पाचवा मोठा मार्केट बनला आहे.
१९९० मध्ये पहिल्यांदा सेन्सेक्स १००० च्या पातळीवर
१९९० पासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सने ६० पेक्षा अधिक वेळा उसळी मारली आहे. २५ जुलै १९९० रोजी सेन्सेक्सने प्रथमच १००० अंकांची पातळी गाठली होती, तर सध्या निर्देशांक ६३ हजार अंकाच्या जवळ व्यवहार करत आहे. बाजार मूल्यांकानुसार भारत ३.३२ ट्रिलियन डॉलरच्या मुल्यासह पाचवा मोठा स्टॉक मार्केट आहे.