प्रकाश आंबेडकर यांनी भारिपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार चालवण्यासाठी सरासरी १३ लाख कोटींची गरज असते. या सरकारकडे तेवढी रक्कम नाही. नवीन बजेट येईपर्यंत रक्कम जमेल की नाही याबद्दल शंका आहे. यंदा सरकारला १२ लाख कोटींची तूट येणार आहे. त्यामुळे देश चालवणं सरकारला कठिण होऊन बसणार आहे. म्हणूनच दारुडा जसा घरातील वस्तू विकतो. त्याप्रमाणं हे सरकार मालमत्ता विकत आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा या सरकारचा हा डाव आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर यांनी अमेरिका-इराण युद्ध झाल्यास त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचं म्हटलं आहे. जेएनयू प्रकरण भाजपकडून घडवलं जात आहे. त्यात त्यांची वृत्ती आहे. हे लोक शहरी आतंकवादी म्हणतात. पण देशातील खरा आतंकवादी संघच आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निकालावर समाधान व्यक्त केलं. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या गांधी शांती यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. सीएए, एनआरसी आणि एनपीआरला विरोध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून ही शांती यात्रा काढण्यात आली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times