पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या मुंबईतील निवासस्थानापाठोपाठ येथील निवासस्थानातही करोनाचा शिरकाव झाला आहे. बारामतीतील पवार यांच्या निवासस्थानातील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मुंबईत सिल्व्हर ओक येथे करोनाचे १६ रुग्ण आढळल्यानंतर शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानातील ५० कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ४ जणांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. करोनाची लागण झालेले चारही कर्मचारी पवारांच्या शेतात आणि बागेत काम करणारी आहेत. या चौघांना करोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चारही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असून त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचीही करोना चाचणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. बारामतीतही करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. बारामतीत आतापर्यंत ४७३ करोना रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी १२ सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. तर पवारांचा करोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. १२ कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर पवारांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पवार यांना राज्यात दौरे न करण्याचं आवाहन केलं होतं. डॉक्टरांनीही पवारांना चार-पाच दिवस कुणालाही न भेटण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील करोना रुग्णसंख्या आणि मृत्युमुखींची संख्याही दोन्ही शहरात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहर व जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या आता सहा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भागातही संसर्ग वाढत असल्याने त्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याचे चित्र आहे.

पुणे शहरात गुरुवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढली. १६६९ जणांना लागण झाली असून आता ७९ हजारापर्यंत रुग्णसंख्या पोहोचली आहे. तर गंभीर रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊन ८०२ रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून ४८६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ३१६ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. तसेच २४८५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. एका दिवसात १३८६ रुग्ण डिस्चार्ज झाले असून आतापर्यंत ६२ हजार ३४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात काल तब्बल १२ हजार २४३ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. तर, राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३७ टक्के इतका झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३२६ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या २१ हजार ३५९ इतकी झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here