जवाहरलाल नेहरू विद्यापीठ () चे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने असे स्पष्ट केले आहे की ‘कुलगुरूंना हटवणे हे या समस्येवरचं उत्तर नाही.’ मनुष्यबळ मंत्रालयाचे सचिव अमित खरे गुरुवारी म्हणाले, ‘नवे वाढीव शुल्क लागू केले जाणार नाही, असे सांगितल्याचे दावे विद्यार्थ्यांनी केले होते. त्यासंदर्भात शुक्रवारी मंत्रालयाचे अधिकारी कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत.’
खरे म्हणाले, ‘कुलगुरुंना हटवणे हे या समस्येचे समाधान नाही. मंत्रालयाचे अधिकारी कुलगुरुंना भेटतील आणि नंतर विद्यार्थी संघटनांनाही भेटलीत.’ दरम्यान, गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जेएनयूच्या प्रतिनिधीमंडळाची बैठक घेऊन चर्चा केली. खरे पुढे म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना घडत आहेत, त्या खूप दुर्दैवी आहेत. विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी आहेत. शिक्षकांच्याही प्रशासनाविरोधात तक्रारी आहेत. आम्ही या सर्व तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.’
मात्र, प्रतिनिधीमंडळाच्या बैठकीनंतर जेएनयूएसयूची अध्यक्ष आइशी घोष हिने सांगितलं होतं की जोपर्यंत कुलगुरुंना पदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत कुठलीच चर्चा होणार नाही. मंत्रालयाला काही बोलायचं असेल तर त्यांनी जेएनयूत यावं, असंही तिने ठामपणे संगितलं.
दरम्यान, जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेविरोधात विद्यार्थ्यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने मोर्चा काढला. हा मोर्चा मध्येच अडवण्यात आला. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटवण्याची मागणी करत आंदोलनकर्ते विद्यार्थी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जात होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times