नागपूर : ‘कुत्रा रात्रभर भुंकतो. झोपू देत नाही. त्यामुळे त्याला गुंगीचे औषध द्यायचे आहे’, असे सांगून डॉ. सुषमा राणे यांनी अवंती हॉस्पिटलमधून भूल देण्याचे इंजेक्शन आणले होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आली. कोराडी पोलिसांनी अवंती हॉस्पिटलमधील कर्मचारी, धीरज राणे कार्यरत असलेल्या रायसोनी कॉलेजचे प्राचार्य व धीरज यांच्या नातेवाईक महिलेची शनिवारी कसून चौकशी केली.

गत काही दिवसांपासून धीरज राणे तणावात होते. जुलैत केवळ दहा दिवसच ते कॉलेजला आले होते. याकाळात ते कॉलेजमध्ये दारू पिऊन यायचे, असे रायसोनी कॉलेजच्या प्राचार्याने चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राचार्याशिवाय पोलिसांनी धीरज यांच्या एका नातेवाइक महिलेचीही चौकशी केली. या महिलेने दिलेल्या माहितीने पोलिसांना धक्का बसला आहे. ‘धीरज माझ्यावर एकतर्फी प्रेम करायचे. ते सतत माझ्याशी मोबाइलवरद्वारे संपर्क साधायचे. प्रेम करीत असल्याचे ते सांगायचे. मात्र, मी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यांना अनेकदा फटकारलेही होते’, असे महिलेने पोलिसांना सांगितल्याचे कळते.

पती धीरजसह दोन अपत्यांची हत्या करून डॉ. सुषमा यांची आत्महत्या का केली याचे नेमके कारण शोधून काढण्यात कोराडी पोलिसांना यश आलेले नाही. मंगळवारी सकाळी डॉ. सुषमा यांनी भूल देण्याचे इंजेक्शन देऊन पती धीरज राणे (वय ४२), मुलगा ध्रुव (वय ११) मुलगी लावण्या (वय ५) या तिघांची हत्या केली. त्यानंतर पंख्याला गळफास घेऊन डॉ. सुषमा यांनी आत्महत्या केली. या घटनेने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली होती. या चौघांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके स्थापन करण्यात आली. चारही पथक कसून तपास करीत आहे. पण अद्यापही मृत्यूमागचे नेमके कारण पोलिसांना कळू शकले नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here