जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेविरोधात विद्यार्थ्यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने मोर्चा काढला. हा मोर्चा मध्येच अडवण्यात आला. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटवण्याची मागणी करत आंदोलनकर्ते विद्यार्थी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जात होते. त्यांना आंबेडकर भवनाजवळ ताब्यात घेण्यात आले आहे.
दुसरीकडे, केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय विभागाच्या अधिकारी आणि प्रतिनिधीमंडळ यांच्यातली बैठक संपली आहे. बैठकीनंतर जेएनयूएसयूची अध्यक्ष आइशी घोष यांनी सांगितले की जोपर्यंत कुलगुरु जगदीश कुमार यांना हटवले जात नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. मंत्रालयाला बोलायचे असल्यास जेएनयू संकुलात यावे.
५ जानेवारी रोजी जेएनयूत विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता. त्या विरोधात देशभरात विद्यार्थी आंदोलन करत निषेध व्यक्त करत आहेत. गुरुवारी राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत राजकीय पक्षांनी मोर्चा काढला. हा मोर्चा मंडी हाऊस ते एचआरडी मंत्रालयाच्या दिशेने काढण्यात आला. या आंदोलनकर्त्यांना शास्त्री भवनजवळ अडवण्यात आलं. या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या मोर्चात सीपीएम नेते सीताराम येच्युरी, प्रकाश करात, वृंदा करात, सीपीआय महासचिव डी. राजा आणि लोकतांत्रिक जनता दलाचे प्रमुख शरद यादव सहभागी झाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times