माझ्या वाढदिवसाच औचित्य साधत मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्लाझ्मा दान देखील केले. मला करोना होऊन गेल्याने माझ्या शरीरात आपसूक अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. प्लाझ्मा दान केल्यास, करोना झालेल्या एखाद्या गरजू व्यक्तीला तो देण्यात येतो. ज्यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचू शकतो. ठाणे परिसरातील एका कोव्हिड रुग्णाला प्लाझ्माची आवश्यकता असल्याचे समजले होते. त्या रुग्णाला माझा प्लाझ्मा देण्यात आला. आता काही वेळापूर्वी त्या रुग्णाच्या तब्येतीबद्दल माहिती घेतली असता सदर रुग्ण आता धोक्याच्या बाहेर असून त्यांची तब्येत आता उत्तम आहे. काही दिवसातच ते पूर्णपणे बरे होतील, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
प्लाझ्मा दान केल्याने कोविड बाधित व्यक्तीचे प्राण वाचले ही बातमी कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. आपल्या एका छोटयाशा कृतीमुळे एका माणसाचा का होईना, पण जीव वाचविण्यासाठी कारणीभूत ठरलो, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, असं सांगतानाच आपण देखील प्लाझ्मा दान करू शकत असाल तर नक्की करा. काय माहिती आपण देखील एखाद्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी कारणीभूत ठरू शकाल, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात काल दिवसभरात १४ हजारांहून अधिक करोना रुग्ण वाढल्यानं रुग्णसंख्या ६ लाख ७१ हजार ९४२ इतकी झाली आहे. तर, राज्यात काल २९७ करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या २१ हजार ९९५ इतकी झाली आहे. तर, राज्यातील मृत्यूदर ३.२७ टक्के इतका झाला आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ चाचण्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात करोनाचे आकडे चिंता वाढवणारे असले तरी रुग्ण बरे होण्याचा दरही अधिक आहे. काल राज्यात तब्बल ९ हजार २४१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यात कालपर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वी जिंकली आहे. तर, राज्याचा ७१. ४५ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३५ हजार ३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times