नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी घडली. चिमुकलीच्या मृत्यूच्या घटनेमुळे शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया महबूब पठाण (वय ७ वर्ष, रा. कादंबरी दर्गा पडेगाव) असं मयत चिमुकलीचं नाव आहे. दरम्यान रविवारी दुपारपासूनच शहरांमध्ये जोरदार पाऊस सुरू होता. सायंकाळी पाऊस वाढला. यावेळी कासंबरीदर्गा परिसरात असलेल्या ओढ्यातील पाणी मोठ्या संख्येने वाहू लागलं.
यावेळी आलिया तिच्या भावासोबत खेळत होती. भावासोबत खेळत असताना अचानक ओढ्यातील पाणी वाढल्यामुळे आलियाचा तोल गेला. यावेळी भावाने तिला हात दिला. मात्र तिचा हात निसटला आणि ती पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेली. यावेळी भावाने आरडा ओरड केली, मात्र आलिया पाण्यात दूर वाहून गेली होती.
दरम्यान घटनेची माहिती तात्काळ छावणी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली. माहिती मिळतच पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे हे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक फौजदार दळवी, हवालदार हिवाळे, सुमित पवार, निवृत्ती तांबे, योगेश राऊत या कर्मचाऱ्यांनी मुलीचा शोध घेतला.
यावेळी काच पूल येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ घाटी रुग्णाला दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.