भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यंदाच्या एप्रिलमध्येच सुरू झाल्या होत्या. त्यावेळी खुद्द शरद पवार यांनाही कळविण्यात आलं. मात्र, सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सरकार स्थापनेची पुढील खेळी करण्याची रणनीती ठरवणाऱ्या पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाकडे बोट दाखवलं आणि पुन्हा अध्यक्षपद स्वीकारून अजित पवार यांच्या मनसुब्यांना धक्का दिला होता. तेव्हाच दादांनी पुढचा प्लॅन ठरवला.
प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे हाऊसमध्ये बैठक पार पडली. भाजप- एकनाथ शिंदेंच्या शिवसेना सरकारमध्ये सामील होण्यासंदर्भातील पहिली गंभीर चर्चा झाली. पवारांना दगा देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी ते सोबत येणार असतील-तर त्यांच्यासोबत अन्यथा त्यांची साथ सोडण्याबाबत दादा आणि त्यांच्या साथीदारांचा निर्णय झाला. मात्र त्यासाठी मी पुढाकार घेणार नाही, तर ईडीची कारवाई सुरु असलेले नेते पवारांना बोलतील, असं अजितदादांनी सांगितलं. त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्यांना अडचणीत आणले जात आहे, त्यांनी पवारांसमोर बाजू मांडण्याचे ठरले.
त्यानुसार छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल आदी नेत्यांनी बाजू मांडली.
सुरुवातीला पवारांनी‘मी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होतो; त्यानंतर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या’, असे ठरवले होते. मात्र नंतर त्यांनी यासंदर्भात दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगत बाजी पलटवली. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या आग्रहाखातर पुन्हा अध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी अजित पवार यांना जोरदार धक्का दिला
अजित पवार मात्र शिंदे-फडणवीसांसोबत जाण्यावर ठाम होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पक्षाचा अध्यक्षपद दादांनी मागितलं. त्यावरही, जयंत पाटील गट तसेच खुद्द पवारांनी विचारासाठी वेळ मागितला, आपल्याला डावललं जात असल्याची भावना दादांच्या मनात तीव्र झाली अखेर त्यांनी पवारांच्या विश्वासू सातीदारांसह वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला.
२०१९ साली दादांनी बंड केलं, त्यावेळी त्यांचं बंड मोडून काढण्यासाठी पवारांसोबत जे ज्येष्ठ नेते होते, यावेळी ते सगळे नेते अजितदादांसोबत आहेत. त्यामुळे पवारांचं टेन्शन नक्कीच वाढलंय. दुसरीकडे अजितदादांनी पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा सांगून एकनाथ शिंदे यांच्या पावलावरच पाऊल टाकलंय. त्यामुळे पवारांनी जनतेच्या न्यायालयात जायचं ठरवलंय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्यांनी नव्या लढ्याला सुरुवात केली आहे. शरद पवार अजित पवारांचं बंड मोडून काढतील का? अजित पवारांच्या साथीदारांना एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडतील का? शरद पवार नेहमीप्रमाणे मास्टरस्ट्रोक मारुन राजकारणात आपणच चाणक्य आहोत, हे दाखवतील का? हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.